Times of Maharashtra Desk: बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी NDA दणदणीत विजय मिळवत पुन्हा एकदा सत्ता स्थापनेच्या दिशेने वाटचाल करत आहे. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार बहुतांश सर्वेक्षणांनी एनडीएला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवली होती आणि मतमोजणीच्या कलांनी हा अंदाज खरा ठरत आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए युतीमध्ये जनता दल-संयुक्त JDU, भारतीय जनता पक्ष BJP आणि इतर लहान पक्ष यांचा समावेश आहे.
या निवडणुकीत एनडीएच्या विजयामागे अनेक प्रमुख घटक कारणीभूत ठरत आहेत. नितीश कुमार यांच्या सुशासन फॅक्टरला महिला मतदारांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. दारूबंदी, पंचायतींमध्ये ५०% आरक्षण, महिलांसाठी मोफत बस प्रवास आणि रस्ते,वीज,पाणी यांसारख्या पायाभूत सुविधांच्या योजनांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तगडा प्रचार डबल इंजिन सरकारची संकल्पना आणि केंद्राच्या विविध योजनांचा फायदा एनडीएला होत आहे. राष्ट्रीय जनता दलाच्या RJD जंगलराजच्या कथित भीतीमुळे मतदारांनी स्थिरतेसाठी एनडीएला पसंती दिल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
दुसरीकडे महाआघाडीचे नेतृत्व करणारे तेजस्वी यादव यांचे १० लाख नोकऱ्यांचे आश्वासन आणि राहुल गांधी यांचा प्रचार मतदारांमध्ये अपेक्षित परिणाम साधू शकला नाही. भाजपच्या मैथिली ठाकूर यांनी अलीनगर मतदारसंघातून मोठी आघाडी घेत विजय निश्चित केल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे आरजेडीच्या कार्यालयाबाहेर मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
एकंदरीतच या निकालांनी महाराष्ट्राच्या निवडणूक पॅटर्नप्रमाणे एक्झिट पोलचा अंदाज चुकीचा ठरवला नाही उलट एनडीएने स्पष्ट बहुमत मिळवत बिहारमध्ये आपली सत्ता अबाधित ठेवली आहे. नितीश कुमार यांच्यावर विश्वास दाखवत बिहारच्या जनतेने एनडीएला विकासाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा संधी दिल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.






















