Times Of Maharashtra Desk : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजप-शिवसेना (शिंदे गट) महायुतीने कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत (KDMC) जोरदार सुरुवात करत राजकीय आघाडी घेतली आहे. महापालिका निवडणुकीत भाजपचे तब्बल 8 उमेदवार बिनविरोध निवडून आले असून, शिंदे गटाच्या शिवसेनेचे 4 उमेदवार बिनविरोध विजयी झाल्याने महायुतीचे एकूण 12 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
सुरुवातीला दोन प्रभागांत भाजप उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने विजयाचा जल्लोष करण्यात आला होता. त्यानंतर रविंद्र चव्हाण प्रथम नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या प्रभागातही भाजप उमेदवाराची बिनविरोध निवड झाली. रेखा चौधरी, आसावरी नवरे आणि रंजना पेणकर यांच्या बिनविरोध निवडीनंतर भाजपने केडीएमसीत विजयाची हॅट्रिक साधली होती.
गुरुवारपर्यंत भाजपच्या 5 जागा बिनविरोध झाल्या होत्या. मात्र अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी आणखी दोन प्रभागांत प्रतिस्पर्धी उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने भाजपचे एकूण 7 उमेदवार बिनविरोध निवडून आले.
प्रभाग 26 अ मधून मुकुंद पेडणेकर, तर प्रभाग 28 मधून महेश पाटील बिनविरोध विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे प्रभाग 28 मधून मनसेचे शहराध्यक्ष मनोज घरत यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने महेश पाटील यांची बिनविरोध निवड झाली, ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. तसेच प्रभाग क्रमांक 19 (क) मधून भाजप-महायुतीचे साई शिवाजी शेलार हेही बिनविरोध निवडून आले आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिकेत एकूण 122 जागा असून बहुमतासाठी 62 जागांची आवश्यकता आहे. त्यापैकी महायुतीचे 12 उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आल्याने बहुमतासाठी आता केवळ 50 जागांची गरज उरली आहे. त्यामुळे महायुतीने निवडणुकीपूर्वीच मोठी आघाडी घेतल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
भाजपचे बिनविरोध निवडून आलेले उमेदवार
वॉर्ड 18 – रेखा चौधरी
वॉर्ड 26 क – आसावरी नवरे
वॉर्ड 26 ब – रंजना पेणकर
प्रभाग 24 ब – ज्योती पाटील
प्रभाग 27 अ – मंदा पाटील
प्रभाग 26 अ – मुकुंद पेडणेकर
प्रभाग 28 – महेश पाटील
प्रभाग क्र. 19 (क) – साई शिवाजी शेलार
ठाण्यात ठाकरे गटाला धक्का
दरम्यान, ठाण्यात शिंदे गटाच्या शिवसेनेने पहिलं खातं उघडलं आहे. प्रभाग क्रमांक 18 मधून जयश्री फाटक या शिंदे गटाच्या उमेदवार बिनविरोध विजयी झाल्या आहेत. त्या माजी आमदार रविंद्र फाटक यांच्या पत्नी असून, ठाकरे गटाच्या उमेदवार स्नेहा नागरे यांनी ऐनवेळी उमेदवारी मागे घेतल्याने ही बिनविरोध निवड शक्य झाली.






















