भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप

भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
मंगळवेढा : भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, त्यांना भ्रष्टाचारावर बोलण्याचा अधिकार नाही. कर्नाटकात काँग्रेस सरकारने राबविलेल्या योजनेबाबत खोटी माहिती पसरवण्याचे काम भाजप करत आहे, अशी टीका कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली.

शनिवारी (दि.१६) मंगळवेढा येथे आयोजित सभेत ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, खा. प्रणिती शिंदे, कर्नाटकचे उद्योगमंत्री एम. बी. पाटील, उमेदवार भगीरथ भालके आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, सामान्य जनतेचे जीवन सुखकर, असे खोटे आश्वासन दिले. शेतकऱ्यांची कर्जमाफी न देता, फक्त भांडवलदारांची कर्जमाफी केली.

कर्नाटकात कर्जमाफी मागितल्यावर भाजप सरकारने नोटा छापायची मशीन आहे का, असे सांगून टाळले; पण मी मुख्यमंत्री झाल्यावर ८५०० कोटींची कर्जमाफी दिली. ‘ऑपरेशन कमळ’साठी आमदार खरेदीसाठी कोट्यवधी रुपये आले कुठून आले. महाराष्ट्रातदेखील एकनाथ शिंदे सरकार पाठीमागील दाराने आले. कर्नाटकात काँग्रेस सरकारची योजना खोटी निघाली तर मी राजीनामा देण्यास तयार आहे, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले.

याचबरोबर, आता ३६५ कोटी महिलांना मोफत एसटी प्रवास सुरू केलाय. गृहज्योती, युवानिधी योजना सुरू केल्या. यासाठी ५६ हजार कोटींची तरतूद करून ठेवलीय. ज्या राज्यात भाजप सत्ता आहे, त्या ठिकाणी या योजना आणल्या का? भाजपने भांडवलदारांचा विचार केला. सर्वसामान्य गोरगरीब शेतकरी यांचा विचार केला नाही. त्यांच्यासाठी महागाई वाढवून ठेवली, असा हल्लाबोल मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भाजपवर केला.

महायुतीचे सरकार नसून महाभीती सरकार आहे : प्रणिती शिंदे
मला खासदार केल्यामुळे तुमचं माझं नातं शेवटच्या श्वासापर्यंत आहे. कामाचा वारसा कायम ठेवू तळागाळात काम करणाऱ्याला संधी दिली. भाजप सरकारचे हे फक्त शासन निर्णयाचे सरकार असून, महायुतीचे सरकार नसून महाभीती सरकार आहे, असा आरोप खासदार प्रणिती शिंदे यांनी केला. तर उमेदवार भगीरथ भालके म्हणाले की, विद्यमान लोकप्रतिनिधी लोकांची दिशाभूल करत तीन हजार कोटींचा निधी आणला, असे सांगता पण सध्या गावोगावच्या रस्त्याची अवस्था बघण्यासारखी झालीय, महाविकास सरकारने जाहीरनाम्यात पंचसूत्रीद्वारे लोकांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला आहे.