Times Of Maharashtra Desk:गेल्या काही दिवसांपासून त्रिशंकू अवस्थेमुळे अडकलेल्या चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्तास्थापनेच्या नाट्याला मंगळवारी अखेर नाट्यमय कलाटणी मिळाली. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने अचानक भाजपला पाठिंबा देत काँग्रेसला मोठा राजकीय धक्का दिला आहे. निकालानंतर आज सकाळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवारआणि ठाकरे गटाचे संदीप गिऱ्हे यांच्यात बैठक झाली होती मात्र, या बैठकीत तीव्र मतभेद झाल्याने वातावरण तापले आणि संतप्त संदीप गिऱ्हे बैठकअर्धवट सोडून बाहेर पडले. त्यानंतर काही वेळातच भाजपचे स्थानिक नेते किशोर जोरगेवार यांनी ठाकरेगटाने भाजपला पाठिंबा दिल्याची अधिकृत घोषणा केली, ज्यामुळे संपूर्ण राजकीय समीकरण बदलले.
असे जुळले आणि असे ठरले
भाजप आणि ठाकरे गटामध्ये महापौरपद सव्वा-सव्वा वर्षांच्या दोन टर्ममध्ये वाटून घेण्यावर एकमत झाले आहे. त्यानुसार, पहिल्या सव्वा वर्षांसाठी भाजपचा तर त्यानंतरच्या सव्वा वर्षांसाठी ठाकरे गटाचा महापौर असेल. ठाकरे गटाचे प्रशांत दानव हे पाच वर्षांसाठी उपमहापौर पदाची जबाबदारी सांभाळतील. तसेच स्थायी समितीचे अध्यक्षपद पहिल्या आणि चौथ्या वर्षासाठी ठाकरे गटाकडे राहणार आहे.
झटपट निर्णय-त्वरित कार्यवाही
गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस आणि ठाकरे गट एकत्र येऊन भाजपला सत्तेबाहेर ठेवतील, अशी जोरदार चर्चा होती. याच पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी सकाळीच उद्धव ठाकरे यांची भूमिका भाजपला कोणत्याही परिस्थितीत चंद्रपूर महापालिकेची सत्ता मिळू देणार नाही,अशीअसल्याचे सांगितले होते. मात्र, काही तासांतच भाजप-ठाकरे गट युतीची घोषणा झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.या सत्तास्थापनेबाबत भाजपनेते किशोर जोरगेवार यांच्या मतानुसार शिवसेनेच्या काही मागण्यांमुळे चर्चा थांबली होती. भाजपकडे २४ नगरसेवकांचे संख्याबळअसतानाही चंद्रपूरच्या सर्वांगीण विकासासाठी ठाकरे गटासोबत महापौरपद वाटून घेण्याचा निर्णय पक्षाने घेतला.
म्हणून घेतला निर्णय! -संदीप गिऱ्हे
दरम्यान, ठाकरे गटाचे नेते संदीप गिऱ्हे यांनी भाजपला पाठिंबा देण्यामागची भूमिका स्पष्ट करताना आमच्या पक्षाला महापौरपद मिळावे, ही आमची ठाम भूमिका होती. यासाठी काँग्रेसशी सातत्याने चर्चा सुरू होती.आज सकाळीही मी विजय वडेट्टीवार यांच्या कार्यालयात जाऊन विनंती केली. मात्र, पाच वर्षांत कुठल्याही टप्प्यावर महापौरपद देण्यास काँग्रेस तयार नव्हती. त्यामुळे विकासाला चालना देण्यासाठी आम्ही भाजपशी चर्चा केली. किशोर जोरगेवार आणि सुधीर मुनगंटीवार आमच्या संपर्कात होते. त्यांनी आमच्या प्रस्तावाला तत्काळ मान्यता दिली आणि त्यानुसार हा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला असे गिऱ्हे यांनी सांगितले. या अनपेक्षित राजकीय घडामोडींमुळे चंद्रपूरच्या राजकारणात नवे समीकरण उदयास आले असून काँग्रेस मात्र पूर्णपणे सत्तेबाहेर फेकली गेली आहे.



















