महाराष्ट्र स्टेट हेट (निलेश ठाकरे) : चंद्रपूर जिल्ह्यातील मजूर सहकारी संस्थांबाबत एक गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कष्टकरी मजुरांच्या आर्थिक उन्नतीसाठी स्थापन झालेल्या या संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर बोगस सभासदांची नोंदणी झाल्याचे आरोप होत आहेत. त्यामुळे खऱ्या गरजू मजुरांच्या हक्कांवर गदा येत असल्याची तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
या प्रकरणी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, चंद्रपूर यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले असून सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे. संबंधितांवर कठोर कारवाई करून अपात्र सभासदांचे सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणी जोर धरत आहे.
मजूर सहकारी संस्था या प्रत्यक्ष मजुरी करणाऱ्या कामगारांना रोजगार आणि आर्थिक स्थैर्य देण्यासाठी स्थापन करण्यात आल्या. मात्र प्रत्यक्षात अनेक संस्थांमध्ये कंत्राटदार, व्यापारी, व्यावसायिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम व्यक्तींना ‘मजूर’ म्हणून दाखवून सभासद करण्यात आल्याचे उघड झाले आहे. काही ठिकाणी महागड्या गाड्यांचे मालक, बार परवाना धारक यांचाही समावेश असल्याचे समोर आले आहे.
यामुळे शासनाच्या विविध योजनांचा लाभ खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नसल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. प्रशासनाची ही उदासीनता की संगनमत, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सहकार विभागाच्या कार्यप्रणालीवरही यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तज्ज्ञांच्या मते, मजूर म्हणून नोंदणी करताना व्यक्तीचे उत्पन्न, व्यवसाय आणि सामाजिक स्थिती यांची पडताळणी करणे आवश्यक आहे. यासाठी विशेष पथक नेमून सर्व संस्थांची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच ज्या संस्थांनी जाणीवपूर्वक बोगस सभासद नोंदवले आहेत, त्यांची नोंदणी रद्द करून संबंधितांवर फौजदारी कारवाई करावी, अशीही मागणी आहे. या प्रकारामुळे सहकार क्षेत्रावरील विश्वास डळमळीत होत असल्याने प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे.






















