Times of Maharashtra Desk: दावोस दौऱ्यातून महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक आणल्यानंतर आता विदर्भाच्या औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे. नागपूरमध्ये आयोजित ‘ॲडव्हांटेज विदर्भ २०२६ : खासदार औद्योगिक महोत्सवा’च्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भासाठी आणि राज्यासाठी मोठ्या घोषणा केल्या. विदर्भात आता ‘महिंद्रा अँड महिंद्रा’ कंपनी १५ हजार कोटींची गुंतवणूक करणार असून, राज्यातील सर्वात मोठा नदीजोड प्रकल्पही विदर्भात साकारला जाणार आहे.
या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी विदर्भाचा कायापालट करण्यासाठी हाती घेतलेल्या विविध प्रकल्पांची माहिती दिली.
महिंद्राचा १५ हजार कोटींचा ‘मेगा प्रोजेक्ट’ विदर्भात आतापर्यंत ऑटोमोबाईल इंडस्ट्रीची कमतरता होती, ती कसर आता भरून निघणार आहे. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने विदर्भासोबत भारतातील सर्वात मोठा करार केला आहे.
- गुंतवणूक: कंपनी नागपुरात १५,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.
- प्रकल्प: येथे ‘नेक्स्ट जनरेशन ईव्ही’ (इलेक्ट्रिक वाहने) आणि इतर वाहन निर्मितीचा इंटिग्रेटेड ऑटोमोबाईल प्रकल्प सुरू होईल.
- उत्पादन: या प्लांटमधून २०२८ पासून उत्पादन सुरू होण्याची अपेक्षा आहे.
- विस्तार: या प्रकल्पाचे मुख्य युनिट नागपुरात असेल, तर सप्लाय युनिट छत्रपती संभाजीनगरमध्ये स्थापित केले जाईल. यामुळे पुण्यापाठोपाठ आता नागपूर, संभाजीनगर आणि नाशिक ही शहरेही ऑटोमोबाईल हब बनणार आहेत.
विदर्भात होणार राज्यातील सर्वात मोठा ‘नदीजोड प्रकल्प’ पाण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी विदर्भात महाकाय नदीजोड प्रकल्प राबवला जाणार आहे.
- भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदी ५०० किलोमीटर लांब कृत्रिम नदीद्वारे बुलढाण्यातील नळगंगा नदीला जोडली जाईल.
- यामुळे वर्ध्याच्या पुढील पश्चिम भागातील दुष्काळी पट्ट्याला पाणी मिळेल.
- यावर्षीच या प्रकल्पाची सुरुवात होणार असून, यामुळे शेती आणि उद्योगांच्या पाण्याची गरज पूर्ण होईल.
अमरावती आणि गडचिरोलीचा ‘मेकओव्हर’ विदर्भातील इतर जिल्ह्यांच्या विकासाचा रोडमॅपही मुख्यमंत्र्यांनी मांडला:
- अमरावती: येथे आशियातील सर्वात मोठे ‘एव्हिएशन स्कूल’ उभारले जात असून, जुलै महिन्यात त्याचे उद्घाटन होईल. जागतिक दर्जाचे वैमानिक येथून तयार होतील.
- गडचिरोली: नक्षलग्रस्त जिल्हा अशी ओळख पुसून गडचिरोलीत औद्योगिक इकोसिस्टीम तयार होत आहे. येथे चीनपेक्षाही स्वस्त ‘ग्रीन स्टील’ तयार करण्याचे उद्दिष्ट आहे. तसेच, येथील विमानतळ ‘गेटवे टू साऊथ इंडिया’ म्हणून विकसित केले जाईल.
- नागपूर: ‘टाटा एरोस्पेस’ कंपनी लवकरच नागपुरात ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ उभारणार आहे. तसेच सोलर मॉड्युलची इकोसिस्टीमही येथे विकसित होत आहे.
औद्योगिक विकेंद्रीकरण मुख्यमंत्री म्हणाले की, “पूर्वी राज्यात केवळ मुंबई आणि ठाणे हे दोनच औद्योगिक मॅग्नेट होते. आता आम्ही कोकणात रायगड, मराठवाड्यात संभाजीनगर आणि विदर्भात नागपूर-अमरावती असे नवीन औद्योगिक मॅग्नेट तयार करत आहोत. दावोस दौऱ्यातून राज्यासाठी ३० लाख कोटी, तर विदर्भासाठी पावणे चार लाख कोटींची गुंतवणूक आणली असून, मागासलेल्या जिल्ह्यांच्या विकासाला आमचे प्राधान्य आहे.”
















