Times Of Maharashtra Desk : कोंढवा (पुणे) परिसरात बडी रातच्या पार्श्वभूमीवर दोन गटांत झालेल्या वादाचे रूपांतर भीषण हिंसाचारात झाले. रस्त्यावर सुरू झालेल्या मारहाणीनंतर थेट ससून रुग्णालयातही हल्ले झाले. या घटनेत दोन्ही गटांतील चार जण गंभीर जखमी झाले असून, कोंढवा पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या प्रत्येकी ८ ते १० जणांविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत तिघांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ फेब्रुवारी रोजी बडी रातनिमित्त कौसरबाग परिसरात मशिदीबाहेर वाद सुरू असताना असलम हनीफ खान यांनी ११२ वर फोन करून पोलिस मदत मागवली. याच कारणावरून दुसऱ्या दिवशी असलम खान यांच्यावर लोखंडी फायटर व धारदार हत्यारांनी हल्ला करण्यात आला. जखमींना ससून रुग्णालयात नेण्यात आले असता, तेथेही दोन्ही गट आमनेसामने आले आणि पुन्हा रक्तरंजित संघर्ष झाला.
या हल्ल्यात असलम खान, त्यांचे भाऊ सलीम खान व पुतण्या अब्दुल समद गंभीर जखमी झाले. तर दुसऱ्या गटातील शफाक अशफाक शेख व त्यांचे साथीदारही जखमी झाले आहेत. दोन्ही बाजूंनी एकमेकांविरोधात तक्रारी दाखल केल्या असून, कोंढवा पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
संपूर्ण प्रकार पार्किंगच्या वादातून सुरू झाल्याचे समोर आले असून, पूर्ववैमनस्यातून हल्ले झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक जगताप व वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे करीत आहेत.
















