Times of Maharashtra Desk: महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीतील राजकीय फोडाफोड पुन्हा एकदा चांगलीच चर्चेत आली आहे. ३ नोव्हेंबर रोजी शिवसेना शिंदे गटातील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. ठाणे जिल्ह्यातील या घडामोडींमुळे महायुतीमध्ये तणाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीयांसह काही पदाधिकाऱ्यांना भाजपात घेतल्याने शिंदे गटात नाराजी उसळली आहे.
रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीतील दोन महत्त्वाचे नेते—सदानंद थरवळ यांचे पुत्र अभिजीत थरवळ आणि कल्याण ग्रामीणचे उपतालुका प्रमुख विकास देसले—यांना भाजपात प्रवेश देत शिंदे गटाला मोठा धक्का दिला आहे. या हालचालीवर तत्काळ प्रतिक्रिया देताना मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी चव्हाण यांच्यावर थेट टीका केली.
“अॅक्शनला रिअॅक्शन होणारच,” शिरसाटांचा इशारा
“रवींद्र चव्हाण त्यांच्या मनाप्रमाणे वागत आहेत. त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला, तर आम्हालाही उत्तर द्यावंच लागेल,” असे संजय शिरसाट म्हणाले. तसेच, अशा प्रकारे फोडाफोड सुरू राहिल्यास भविष्यात स्वतंत्र निवडणुका लढवाव्या लागतील, असा इशाराही त्यांनी दिला. “लोकांना महायुती हवी आहे, पण जर फाटाफूट कराल तर आम्ही स्वतंत्र लढू,” असे शिरसाटांनी स्पष्ट केले.
डोंबिवलीतील शिंदे गटाचाही चव्हाणांवर हल्लाबोल
या घडामोडींनंतर डोंबिवलीतील शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनीही रवींद्र चव्हाणांवर जोरदार टीका केली. “सांस्कृतिक नगरीत ते कुठल्या दिशेने चालले आहेत? चार वेळा आमदार, एकदा मंत्री आणि आता प्रदेशाध्यक्ष असूनही त्यांना स्वतःचा गड बांधता आला नाही,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
शिवसेना आणि भाजपची युती अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात मजबूत झाली होती, हे चव्हाणांनी लक्षात ठेवावे, अशी टीका शिंदे गटाने केली. “शिवसेनेचे शंभर कार्यकर्ते फोडले तरी त्या फोडाफोडीतून हजार कार्यकर्ते तयार करण्याची ताकद आमच्यात आहे,” असा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला.
डोंबिवलीतील या राजकीय हालचालींमुळे महायुतीच्या घटकांमधील सूक्ष्म तणाव अधिकच वाढल्याचे चित्र आहे. आगामी महापालिका निवडणुकांपूर्वी हे राजकारण आणखी तापण्याची शक्यता नाकारता येत नाही.






















