Times of Maharashtra Desk: येत्या कुंभमेळ्याच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर तपोवन परिसरातील साधुग्राम साठी सुरू असलेल्या वृक्षतोडीला मोठा विरोध सुरू आहे. साधू-महंतांसाठी 1,150 एकरांवर भव्य साधुग्राम उभारण्याचे नियोजन करण्यात येत असून त्यासाठी जवळपास 1,800 झाडांची कत्तल केली जात आहे. या पार्श्वभूमीवर पर्यावरणप्रेमी, वृक्षप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते तसेच राजकीय पक्ष आणि कलाविश्वातील अनेक कलाकार आक्रमक झाले आहेत.अभिनेता सयाजी शिंदे यांनीही या वृक्षतोडीविरोधात कडाडून भूमिका मांडत सवाल केला आहे “ज्यांच्यासाठी झाडं तोडत आहात, त्या साधू-संतांना तरी ही झाडतोड पटेल का?”
6 डिसेंबरला मोठा आंदोलन कार्यक्रम
तपोवनातील झाडतोडीच्या मुद्द्यावर अनेक नेते व कलाकार सोशल मीडियावरून आवाज उठवत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना कर्मचारी यांनीही झाडतोडीविरोधात निषेध जाहीर केला आहे. या निषेधार्थ शनिवार, 6 डिसेंबर रोजी संभाजीनगर रोडवरील कमानीजवळ हा निषेध करण्यात येणार असून सर्व कलाकार आणि नाशिककरांना सहभागी होण्याचे मनसेकडून आवाहन करण्यात आले आहे.
“दहा वर्षांची झाडं तोडून नवीन झाडं लावण्याची कल्पना चुकीची” — सयाजी शिंदे
पत्रकार परिषदेत बोलताना सयाजी शिंदेंनी शासनाच्या पूरक वृक्षलागवड धोरणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणाले “दहा वर्षे वाढलेली झाडं तोडून त्यांच्या बदल्यात नवी झाडं लावायची? म्हणजे पोरांना मारायचं आणि आई-बापाला जिवंत ठेवायचं! झाडं ही आपली आई-वडील आहेत. आपण जगतो ते झाडांमुळे. त्यांच्यावर हल्ला होत असताना आपण गप्प कसे बसायचं?”
साधूंना झाडं तोडणं मान्यच नाही” — शिंदे
“आम्ही साधू-संतांचा अपमान करत नाही. पण झाडं तोडणं त्यांना पटेल का? ऋषी-मुनी झाडांच्या सावलीत तपश्चर्या करत होते,” असे ते म्हणाले.मंत्री नितेश राणे यांच्या वक्तव्याबाबत विचारले असता, “मला त्यावर उत्तर द्यायचं नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले.यावर निष्कर्ष देताना त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले की
“झाडं लावण्यापेक्षा झाडं जगली पाहिजेत हे महत्त्वाचं. वृक्षतोड ही मुळात चुकीची गोष्ट आहे.”






















