Times Of Maharashtra Desk : जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोलापूर जिल्ह्यात घेतलेल्या जाहीर सभांनी संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले आहे. बार्शी आणि मोहोळ तालुक्यातील सभांमधून शिंदेंनी दिलेले राजकीय संकेत सध्या जोरदार चर्चेचा विषय ठरत आहेत.
बार्शीतील सभेत ठाकरे गटाचे आमदार दिलीप सोपल हे थेट शिंदेंच्या व्यासपीठावर दिसून आले, तर मोहोळ येथील सभेत शरद पवार गटाचे आमदार राजू खरे यांनी शिंदेंचे स्वागत केले. त्यामुळेच या दोन्ही सभा राजकीयदृष्ट्या अधिकच लक्षवेधी ठरल्या.
मात्र, मोहोळमधील सभेत शिंदेंनी केलेल्या एका वक्तव्याने सर्वांनाच धक्का दिला. नरखेड पंचायत समिती गणात शिवसेनेच्या चिन्हावर उभ्या असलेल्या उमेदवाराला मत देऊ नका, आघाडीचा धर्म पाळा, असे थेट आवाहन त्यांनी मंचावरून केले. विशेष म्हणजे हे वक्तव्य खुद्द शिवसेना मुख्य नेत्याकडून आल्याने राजकीय वर्तुळात संभ्रम आणि खळबळ उडाली आहे.
नरखेड गणात शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची युती असतानाही एकाच गणातून दोन उमेदवार रिंगणात उतरल्याने आधीच गोंधळाची स्थिती होती. शिवसेनेकडून ज्योत्स्ना पाटील, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून प्रगती दगडे यांना उमेदवारी देण्यात आली होती. प्रचारसभेदरम्यान स्थानिक नेत्यांकडून शिंदेंना एक चिठ्ठी देण्यात आली. ती वाचल्यानंतर शिंदेंनी ज्योत्सना पाटील या आमच्या उमेदवार नाहीत, येथे आघाडीचा धर्म पाळावा, असे स्पष्ट केले.
दरम्यान, ज्योत्स्ना पाटील या भाजप नेते राजन पाटील यांच्या कार्यकर्त्या असून, शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, त्यांनी अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळेच शिंदेंनी जाहीरपणे त्यांना शिवसेनेचा उमेदवार नसल्याचे सांगितल्याचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी स्पष्ट केले.
या घडामोडींमुळे सोलापूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली असून, शिंदेंच्या भूमिकेमुळे युतीतील अंतर्गत विसंवाद चव्हाट्यावर आला आहे.






















