गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : गेवराई शहराचा विस्तार दिवसेंदिवस मोठ्या वेगाने होत असताना ताकडगाव रोड परिसरातील श्री समर्थ पार्क, मातोश्री पार्क तसेच माधव नगर भागात सध्या वीजेचा मोठा खेळखंडोबा पाहायला मिळत आहे. सतत खंडित होणारी वीज, कमी दाबाने होणारा वीजपुरवठा आणि वारंवार लाईट जाण्याच्या प्रकारामुळे नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत. विशेषतः सध्या उन्हाळ्याच्या तीव्र उकाड्यात नागरिकांचे हाल होत आहेत. या परिसरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर नवीन घरे उभी राहिली आहेत.
अनेक ठिकाणी बांधकामे सुरू असून लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र त्यानुसार वीज यंत्रणेमध्ये आवश्यक वाढ करण्यात आलेली नसल्याने संपूर्ण भार तथास्तु मंगल कार्यालयाजवळील विद्युत रोहित्रावर पडत आहे. या रोहित्रावर ओव्हरलोड येत असल्यामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. तरी या परिसराचा विस्तार पाहता याठिकाणी एक नवीन विद्युत रोहित्र बसविण्यात यावे, अशी मागणी पत्रकार विनोद नरसाळे यांनी केली आहे.
सध्या तापमानाचा पारा चांगलाच वाढला असून दुपारपासून रात्री उशिरापर्यंत उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. अशा परिस्थितीत अचानक लाईट गेल्यानंतर नागरिकांना अक्षरशः घराबाहेर बसण्याची वेळ येत आहे. लहान मुले घामाघूम होत असून वृद्ध नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. सतत खंडित होत असलेल्या वीजपुरवठा यामुळे घरांमध्ये कुलर, पंखे व इतर उपकरणे बंद होत असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
विशेष म्हणजे वीज आली तरी ती अत्यंत कमी व्होल्टेजने येत असल्यामुळे फ्रिज, टीव्ही, मोटार, इन्व्हर्टर यांसारखी घरगुती उपकरणे व्यवस्थित चालत नसल्याची तक्रार नागरिक करत आहेत. कमी दाबामुळे अनेक उपकरणे जळण्याची भीती देखील व्यक्त केली जात आहे.
या सर्व प्रकारामुळे संतप्त झालेल्या परिसरातील नागरिकांनी ताकडगाव रोडलगत नवीन विद्युत रोहित्र मंजूर करून तात्काळ बसविण्याची मागणी केली आहे. परिसरातील वाढती घरे, लोकसंख्या आणि भविष्यातील गरज लक्षात घेता महावितरणने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी पत्रकार विनोद नरसाळे यांनी गेवराई येथील महावितरण कंपनीचे उपअभियंता मोरे यांना निवेदन देऊन केली आहे. यावेळी ज्येष्ठ पत्रकार सुभाष सुतार यांची उपस्थिती होती.






















