विनोद पवार (जळगाव प्रतिनिधी) : कोरोना महामारीच्या कठीण काळात गावपातळीवर जीव धोक्यात घालून सेवा बजावणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना शासन निर्णयानुसार देय असलेले प्रोत्साहनपर मानधन अद्याप मिळाले नसल्याची बाब समोर आली आहे. शासनाने काढलेल्या GR नुसार संबंधित कर्मचाऱ्यांना दरमहा ₹2000 प्रमाणे 23 महिन्यांचे मानधन देण्याचे निर्देश दिले होते. मात्र अनेक ठिकाणी हा लाभ प्रत्यक्षात पोहोचलेला नाही, अशी तक्रार आहे.
कोविड-19 च्या काळात या कर्मचाऱ्यांनी निर्जंतुकीकरण मोहीम, जनजागृती, क्वारंटाईन व्यवस्थापन, आरोग्य विभागाला सहकार्य, तसेच विविध शासकीय योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवणे अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. विशेषतः अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी घराघरांत जाऊन आरोग्यविषयक समन्वय साधत मोठे योगदान दिले होते.
या सेवेला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने विशेष मानधन जाहीर केले असले, तरी प्रत्यक्ष अंमलबजावणीत विलंब होत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
संबंधित विभागाने शासन परिपत्रकाची तातडीने अंमलबजावणी करून सर्व पात्र ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना त्यांचे हक्काचे मानधन तत्काळ द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे. कोरोनासारख्या संकटात निस्वार्थपणे सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान राखण्यासाठी शासनाने जाहीर केलेला लाभ लवकरात लवकर मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.






















