देवा आत्राम ( यवतमाळ प्रतिनिधी ) : “मोदी हटाव, देश बचाव!” या घोषणांनी आज मारेगाव तहसील कार्यालय परिसर दणाणून गेला. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. देशाचे संविधान आणि कष्टकरी शेतकऱ्यांचे भविष्य वाचवण्यासाठी हा लढा असल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत पुकारण्यात आलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी मारेगाव येथेही मोठ्या संख्येने कार्यकर्ते रस्त्यावर उतरले.
मोर्चादरम्यान केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. अमेरिकेसोबत झालेल्या करारांमुळे देशातील शेतकरी अडचणीत येणार असल्याचा आरोप करत या करारांचा जाहीर निषेध करण्यात आला. स्वस्त दरात सोयाबीन आणि मका आयात केल्यास स्थानिक शेतमालाचे भाव कोसळतील आणि शेतकऱ्यांचे कंबरडे मोडेल, अशी भीती आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष राजू निमसटकर म्हणाले, “पंतप्रधानांनी अमेरिकेच्या दबावाखाली येऊन जे करार केले आहेत, त्यामुळे आपल्या सोयाबीन आणि मक्याचे भाव कोसळतील. हे सरकार केवळ इव्हेंटबाजीत मग्न असून देशाच्या सुरक्षेची यांना पर्वा नाही.” त्यांनी लोकशाही आणि संविधानावर घाला घालणाऱ्या सत्ताधाऱ्यांविरोधात एल्गार पुकारला.
आंदोलनात मारेगाव तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या आणि स्थानिक नागरिकांची लक्षणीय उपस्थिती होती. तहसील कार्यालयासमोर निवेदन देत सरकारने शेतकरीविरोधी धोरणे तात्काळ मागे घ्यावीत, अशी मागणी करण्यात आली.






















