विष्णू गायकवाड (गेवराई प्रतिनिधी ) : बीड जिल्ह्याला संत परंपरेचा समृद्ध वारसा लाभला असून या भूमीत अनेक थोर संतांनी भागवत धर्माची पताका उंचावली आहे. संत नगद नारायण महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त गेवराई शहरात भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. संत गजानन महाराज मंदिर येथे सुरू असलेल्या १५ व्या कीर्तन महोत्सवाची सांगता ह.भ.प. संभाजी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने उत्साहात झाली.
यावेळी बोलताना संभाजी महाराज म्हणाले की, आपण कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असलो तरी जीवनात साधू-संतांचे आशीर्वाद घेऊन संस्कार आणि सत्यसंकल्पाने साधना केली तर ध्येयाची निश्चित प्राप्ती होते. संवादाने जीवन परिपूर्ण होते, मात्र संवाद करताना विवाद टाळावा. चिंता न करता आनंदाने जीवन जगावे आणि सुसंस्कार जपावेत, असे मार्गदर्शन त्यांनी केले.

कीर्तनादरम्यान संत तुकाराम महाराज यांच्या अभंगावर सुंदर विवेचन करण्यात आले. तसेच आई-वडील, गायी आणि घरी आलेल्या साधूची सेवा केल्यास जीवन समाधानकारक होते, असा मौलिक संदेश त्यांनी दिला.
या सोहळ्यास ह.भ.प. महादेव महाराज भाटेपुरी, माजी आमदार अमरसिंह पंडित, माजी राज्यमंत्री बदामराव पंडित, बाळराजे पवार, रोहित पंडित, भाऊसाहेब नाटकर आदींसह अनेक मान्यवर व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कीर्तनानंतर प्रभूशेठ पिसाळ व गुणाजी काकडे यांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समिती सदस्य, वारकरी व भजनी मंडळांनी मंडळानी परिश्रम घेतले.






















