विनोद पवार ( जळगाव प्रतिनिधी ) : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असून उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत जळगाव जिल्हा शिक्षण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा ९ मार्चपासून सकाळच्या सत्रात घेण्याचे आदेश माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांनी जारी केले आहेत.
या निर्णयानुसार जिल्ह्यातील शासकीय, अनुदानित तसेच खाजगी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये वर्ग सकाळच्या सत्रात घेण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना दुपारच्या कडक उन्हाचा त्रास होऊ नये तसेच उष्माघातासारख्या आरोग्याच्या समस्या टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. वाढत्या तापमानामुळे विद्यार्थ्यांना दुपारच्या वेळेत शाळेत ये-जा करताना मोठा त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे शाळांचे वेळापत्रक बदलून सकाळचे सत्र सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
दरम्यान, या आदेशातून सीबीएसई बोर्डाच्या शाळांना वगळण्यात आले आहे. मात्र इतर सर्व इंग्रजी माध्यम शाळांनाही हा निर्णय लागू राहणार असल्याचे शिक्षण विभागाने सांगितले. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा सातत्याने वाढत असल्याने पालक आणि शिक्षकांकडूनही शाळांचे वेळापत्रक बदलण्याची मागणी करण्यात येत होती.
हवामान खात्याने देखील १५ मार्चपर्यंत उष्णतेची तीव्रता कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत शिक्षण विभागाने सकाळच्या सत्राचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याबरोबरच त्यांच्या आरोग्याचेही संरक्षण होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



















