Times Of Maharashtra Desk : अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. त्यांच्या पश्चात सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाच्या चर्चांना पुन्हा उधाण आले. शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्र येणार असल्याच्या दाव्यांमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना सुरुवात झाली होती. मात्र या सर्व चर्चांदरम्यान आता शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका स्पष्ट केली आहे.
पत्रकारांशी संवाद साधताना शशिकांत शिंदे म्हणाले की, “दादा असताना दोन्ही पक्षांच्या एकत्रीकरणाबाबत काही चर्चा झाल्या होत्या आणि निर्णयाचाही विचार झाला होता. त्यांच्या पक्षातील अनेक लोक याबाबत बोलत आहेत. मात्र आता आम्ही हा विषय पूर्णपणे बंद केला आहे. आम्हीच विलीनीकरणासाठी आग्रही आहोत, असे चित्र निर्माण केले जात आहे; परंतु त्यात तथ्य नाही.”
अजितदादांच्या निधनानंतर त्यांच्या इच्छेबाबत चर्चा झाली. आम्ही फक्त सत्य मांडले. शपथपूर्वक जे बोललो तेवढेच. त्यानंतर या विषयावर आम्ही कोणतीही पुढील चर्चा केलेली नाही. दादांची इच्छा पूर्ण करायची एवढेच आम्ही म्हटले होते; मात्र आता यावर अधिक बोलायचे नाही, असा निर्णय घेतला आहे.
आम्ही फक्त आमची भूमिका मांडली
दरम्यान, विलीनीकरणानंतर राजकीय समीकरण काय असणार होते अजित पवार गट एनडीएमध्ये राहणार होता की बाहेर पडणार होता या प्रश्नावर शिंदे यांनी सावध भूमिका घेतली. जिल्हा परिषद निवडणुकांच्या निकालानंतर पुढील निर्णय होणार होता. त्यांच्या मनात काय होते, हे त्यांच्या अनुपस्थितीत सांगणे योग्य नाही. एनडीएबाबतचा निर्णय हा आता त्यांच्याच पक्षाने घ्यायचा आहे असे त्यांनी स्पष्ट केले.शेवटी त्यांनी नमूद केले की, इथून पुढे एनडीएसोबत जायचे की नाही, हा निर्णय आता सुनेत्रा वहिनींचा अधिकार आहे.
तूर्तास विलीनीकरण या विषयाला पूर्ण विराम !
या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमधील विलीनीकरणाच्या चर्चांना सध्या तरी पूर्णविराम मिळाल्याचे चित्र आहे. मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना कोणते वळण मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
















