माणगांव( प्रतिनिधी जयेंद्र मुंढे) : रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथे घडलेल्या कु. पल्लवी प्रविण मोरे हत्याकांड प्रकरणात पीडित कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी अनुभवी विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडे करण्यात आली आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले युवक आघाडी कोकण प्रदेशाचे कार्याध्यक्ष अमित कांबळे यांनी यासंदर्भात निवेदन सादर केले. या निवेदनात अलिबाग जिल्हा व सत्र न्यायालयातील अनुभवी वकील अॅड. प्रसाद पाटील तसेच महाड येथील अॅड. संजय भिसे यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, कु. पल्लवी मोरे ही अनुसूचित जाती प्रवर्गातील अत्यंत गरीब कुटुंबातील मुलगी होती. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी आणि न्यायालयीन लढा प्रभावीपणे लढता यावा यासाठी अनुभवी सरकारी वकिलांची आवश्यकता असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
अड. प्रसाद पाटील यांनी अनेक गाजलेल्या फौजदारी खटल्यांमध्ये काम केले असून जिल्हा सरकारी वकील म्हणूनही त्यांना मोठा अनुभव आहे. तसेच अॅड. संजय भिसे यांनाही फौजदारी प्रकरणांचा दीर्घ अनुभव असल्याने या दोघांची नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय पल्लवी मोरे ही कुटुंबातील कमावती सदस्य असल्याने तिच्या कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय नोकरी देण्यात यावी, अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या हत्याकांडामुळे रायगड जिल्ह्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, अशी मागणी विविध सामाजिक संघटनांकडून सातत्याने करण्यात येत आहे.






















