म्हसवड दि. १३ : माण-खटाव तालुक्यातील पाणी प्रश्न, पाणी वाटपातील अन्याय, पाणी चोरी आणि पाटबंधारे विभागाच्या कथित संगनमताविरोधात आज म्हसवड येथे शेतकऱ्यांनी तीव्र आक्रोश मोर्चा काढला. तब्बल ४० ते ४१ अंश तापमानातही शेकडो शेतकरी व महिला मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. या आंदोलनामुळे संपूर्ण तालुक्यात पाणी प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मोर्चाची सुरुवात म्हसवड येथील सिद्धनाथ रथगृहापासून झाली. सिद्धनाथ मंदिर, बाजारपेठ, सरकारी दवाखाना आणि एस.टी. स्टँड मार्गे मोर्चा अप्पर तहसीलदार कार्यालयावर धडकला. महिला शेतकऱ्यांनी अप्पर तहसीलदार सौ. मीना बाबर यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.
या आंदोलनाचे नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते महेश करचे यांनी केले. यावेळी बोलताना त्यांनी प्रशासनावर गंभीर आरोप करत “माण-खटावमध्ये पाणी घोटाळा झाला असून काही भागांना दोन-दोन आवर्तने दिली जातात, तर पूर्व भागाला एकही आवर्तन मिळत नाही,” असा आरोप केला. तसेच जिहे-कटापूर आणि तारळी योजनेतील पाणी वाटपात अन्याय व पाणी चोरी होत असल्याचाही मुद्दा त्यांनी उपस्थित केला.
आंदोलनकर्त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करणे, समन्यायी पाणी वाटप सुरू करणे, शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई देणे आदी मागण्या केल्या. आंदोलनानंतर अनेक शेतकऱ्यांनी रक्तदान करून प्रशासनाचे लक्ष वेधले. “भले आमचे रक्त घ्या, पण आम्हाला आमच्या हक्काचे पाणी द्या,” अशी भावनिक प्रतिक्रिया महेश करचे यांनी व्यक्त केली.






















