अखिल कुणबी समाज मंडळ, ब्रह्मपुरीचे प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) :- आगामी २०२६-२७ च्या राष्ट्रीय जनगणनेत इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गासाठी स्वतंत्र रकाना (कॉलम) समाविष्ट करण्यात यावा, या मागणीसाठी अखिल कुणबी समाज मंडळ, ब्रह्मपुरीच्या वतीने प्रांत अधिकाऱ्यांना सविस्तर निवेदन देण्यात आले. शासनाने या मागणीवर तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास आगामी राष्ट्रीय जनगणनेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
सध्याच्या जनगणना प्रक्रियेत अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमाती (एसटी) यांच्यासाठी स्वतंत्र रकाने उपलब्ध असताना, ओबीसी समाजाची नोंद ‘इतर’ या वर्गवारीत केली जाते. त्यामुळे ओबीसी समाजाची अचूक लोकसंख्या समोर येत नसल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. देश व राज्यातील मोठ्या लोकसंख्येच्या या प्रवर्गाला स्वतंत्र ओळख मिळणे आवश्यक असल्याचे मंडळाने स्पष्ट केले.
ओबीसी समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासासाठी अचूक लोकसंख्येची आकडेवारी अत्यंत महत्त्वाची असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण, शासकीय योजना आणि इतर लाभ मिळण्यासाठी स्वतंत्र नोंद आवश्यक असल्याचे समाज बांधवांनी सांगितले. अधिकृत आकडेवारीअभावी ओबीसी समाजाच्या हक्कांवर परिणाम होत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
आगामी राष्ट्रीय जनगणना ही पूर्णपणे डिजिटल स्वरूपात होणार असल्याने, प्रपत्रात स्वतंत्र कॉलम समाविष्ट करणे तांत्रिकदृष्ट्या सहज शक्य असल्याकडेही शिष्टमंडळाने प्रशासनाचे लक्ष वेधले.
हे निवेदन ब्रह्मपुरी प्रांत अधिकाऱ्यांमार्फत केंद्र व राज्य शासनाकडे पाठविण्यात आले आहे. शासनाने मागणीची गंभीर दखल न घेतल्यास भविष्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल तसेच संपूर्ण कुणबी व ओबीसी समाज जनगणनेच्या प्रक्रियेवर बहिष्कार टाकेल, असा स्पष्ट इशारा मंडळाने दिला.
निवेदन सादर करताना अखिल कुणबी समाज मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अभिप्राय
“ओबीसींची जातनिहाय जनगणना करणे आणि स्वतंत्र रकाना देणे हा समाजाचा घटनात्मक अधिकार आहे. मात्र केंद्र सरकार जाणीवपूर्वक ओबीसींची खरी लोकसंख्या दडपण्याचा प्रयत्न करत आहे. ठोस आकडेवारी नसल्याने समाजाचे राजकीय, शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान होत आहे. जर आगामी जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम देण्यात आला नाही, तर आम्ही पूर्ण ताकदीने जनगणनेवर बहिष्कार टाकू.”
— प्रमोद भाऊ चिमूरकर
माजी जिल्हा परिषद सदस्य, काँग्रेस चंद्रपूर तथा उपाध्यक्ष, अखिल कुणबी समाज मंडळ, ब्रह्मपुरी






















