सामान्य नागरिकांची शासकीय कामे जलद, पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने व्हावीत या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरा’ला बोराडी येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिरपूर तहसील कार्यालय यांच्या वतीने आयोजित या शिबिरात ६०० हून अधिक नागरिकांची विविध प्रलंबित कामे मार्गी लावण्यात आली.
राज्य शासनाच्या ‘महाराजस्व अभियान टप्पा १’ अंतर्गत आयोजित या शिबिरात महसूल विभागाशी संबंधित तब्बल १४ सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. यामध्ये प्रलंबित फेरफार, ७/१२ मधील त्रुटी दुरुस्ती, डिजिटल ७/१२ व ८-अ उताऱ्यांचे वितरण तसेच उत्पन्न, रहिवासी आणि शालेय दाखल्यांचे जागीच वाटप करण्यात आले.
याशिवाय संजय गांधी निराधार योजना, पीएम किसान योजना, आयुष्मान भारत कार्ड, नवीन शिधापत्रिका, ट्रॅक्टर अनुदान तसेच वनपट्टाधारकांच्या केवायसीची कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात आली. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी तहसीलदार महेंद्र माळी यांनी शासन नागरिकांच्या सेवेसाठी कटिबद्ध असून अशा शिबिरांमुळे सामान्यांना कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत नाहीत, असे सांगितले. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार रंधे यांनी महसूल विभागाच्या लोकाभिमुख उपक्रमाचे कौतुक केले.
कार्यक्रमाला बोराडी उपसरपंच राहुल रंधे, ग्रामस्थ, विद्यार्थी, तलाठी, कृषी सहाय्यक तसेच आरोग्य विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार महेंद्र माळी यांनी केले, तर आभार प्रदर्शन मंडळ अधिकारी पावरा यांनी मानले.






















