Times of Maharashtra Desk : राज्यभरात झालेल्या नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये महायुतीला अभूतपूर्व यश मिळाले असून, भाजपने महाराष्ट्रात पहिला क्रमांक मिळवला आहे. नागपूर जिल्ह्यातील निकालांनुसार भाजपने जोरदार कामगिरी करत नगराध्यक्ष व नगरसेवकांमध्ये बहुमत मिळवले असून, जिल्ह्याने मानाचा ताट ठेवला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीनंतर दिलेल्या प्रतिक्रियेत सांगितले की, “महायुतीने ७५ टक्के नगराध्यक्ष निवडून आणले आहेत. निवडून आलेल्या नगरसेवकांची संख्या दुपटीपेक्षा जास्त वाढली आहे. विरोधकांचे बालेकिल्ले पूर्णपणे उध्वस्त झाले असून सावनेरमध्ये काँग्रेसचा एकही नगरसेवक निवडून आलेला नाही.”
नागपूर जिल्ह्यातील विजयी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांना आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रामगिरी येथील शासकीय निवासस्थानी छोटेखानी सत्कार देण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, “विजयाची ही मालिका महापालिकेतही कायम ठेवू, महापालिका जिंकू आणि नंतर जिल्हा परिषदही जिंकू. मात्र विजयाने आपण माजणार नाही, हे लक्षात ठेवावे.”
भाजपच्या प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह नेत्यांनी निवडणुकांमध्ये आक्रमक प्रचार केला. राज्यभरात भाजपचे १२० नगराध्यक्ष निवडून आले असून ही आता पर्यंतची सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरली आहे. विशेषतः पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील जिल्ह्यांत भाजपने चांगली कामगिरी केली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी विजयी कार्यकर्त्यांचेही कौतुक केले आणि सांगितले की, नागपूर जिल्ह्यातील २७ भागांमध्ये जोरदार विकासाची जबाबदारी विजयी नगरसेवकांवर आहे. विजयी नगरांना ‘मॉडेल शहर’ म्हणून विकसित करण्याची योजना आहे.






















