Times of Maharashtra Desk Pune: स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री आणि भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त महात्मा गांधी उर्दू विद्यालय (म.न.पा. शाळा क्रमांक 13 G आणि 65 G) येथे मंगळवार, 18 नोव्हेंबर 2025 रोजी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. समाजसेवक सिकंदर मुलाणी यांनी त्यांच्या पत्नी सायराबी मुलाणी यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आयोजित करण्याची विनंती केली होती.
विद्यार्थ्यांनी “मौलाना आझाद यांचे जीवन व सामाजिक आणि राजकीय कार्य” या विषयावर उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत प्रभावी भाषणे सादर केली. स्पर्धेत सब्रूनिसा मेराज खान हिने प्रथम क्रमांक, अफिफा कदीर अन्सारी हिने द्वितीय क्रमांक, अफिया सलमान शाह हिने तृतीय क्रमांक, खतिजा रईस खान हिने चतुर्थ क्रमांक तर झोया मकबूल अन्सारी हिने पाचवा क्रमांक पटकावला.
स्पर्धेचे परीक्षक म्हणून टाईम्स ऑफ महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक व तरुण पत्रकार मुज्जम्मील शेख उपस्थित होते. ज्येष्ठ समाजसेवक मोहम्मद शफीकभाई सय्यद यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाने प्रभावित होत परीक्षक मुज्जम्मील शेख यांनी चतुर्थ आणि पाचव्या क्रमांकाच्या विद्यार्थीनींना वैयक्तिकरित्या रोख पारितोषिक देऊन प्रोत्साहन दिले. तसेच समाजसेवक अकबर मुलाणी यांनी सर्व सहभागी विद्यार्थ्यांचा गौरव म्हणून प्रत्येकी पाचशे रुपयांचे रोख पारितोषिक दिले.

शाळा 13 G च्या मुख्याध्यापिका झायेदा मोहम्मद शफीक शेख आणि शाळा 65 G च्या मुख्याध्यापिका अफशा साबीर अली कुरेशी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक युनुस शेख, तबस्सुम इनामदार, तंजिला फातिमा यांनी विद्यार्थ्यांची उत्कृष्ट तयारी करून घेतली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेत आमेना शेख, नौशाद ताजमोहम्मद, अंजुम शेख, जलील सर, तहसीन शेख, हबीबा शेख, इराम मोमीन आणि समिना शेख यांनी सक्रिय योगदान दिले.
या स्पर्धेच्या माध्यमातून मनपा शाळांतील विद्यार्थीही तितकेच आत्मविश्वासपूर्ण, हुशार आणि बहुगुणी असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सिकंदर मुलाणी यांनी दोन्ही मुख्याध्यापिका व सर्व शिक्षकांचे मनःपूर्वक आभार मानले.






















