Times Of Maharashtra : नाशिक महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि महायुतीतील मित्रपक्षांमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. भाजप नेते व मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या भाजपला कुबड्यांची गरज नाही या वक्तव्यामुळे शिंदे गटातील शिवसेना आक्रमक झाली असून, या वादाची दखल थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नाशिक महापालिकेची निवडणूक भाजपने स्वबळावर लढवली आहे. मात्र, सत्तास्थापनेसाठी समन्वय साधण्याच्या उद्देशाने भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी शिवसेना (शिंदे गट) आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेत सहभागी होण्याचा प्रस्ताव दिला होता. हा प्रस्ताव महायुतीतील सलोखा राखण्यासाठी असल्याचे सांगितले जात होते. मात्र, याच प्रस्तावावर मंत्री गिरीश महाजन यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करत भाजपला कुणाच्या कुबड्यांची गरज नाही असे विधान केल्याने राजकीय वातावरण तापले.
या वक्तव्यावरून शिवसेना शिंदे गटाने भाजपवर जोरदार टीका केली आहे. भाजपकडूनच सत्तेत सहभागी होण्याचा प्रस्ताव आला आणि आता तेच नकार देत आहेत. भाजपमध्येच समन्वयाचा अभाव आहे, असा आरोप शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
शिवसेना उपनेते अजय बोरस्ते यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. भाजपचे शहराध्यक्ष स्वतः आमच्या कार्यालयात आले होते आणि त्यांनीच सत्तेत सहभागी होण्याचा प्रस्ताव दिला. आता गिरीश महाजन ‘कुबड्या नको’ असा शब्दप्रयोग करतात, हे अनाकलनीय आणि अत्यंत चुकीचे आहे, असे ते म्हणाले.
बोरस्ते यांनी पुढे स्पष्ट केले की, या संपूर्ण प्रकरणावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली जाणार असून, ते जो निर्णय देतील तो मान्य केला जाईल. शिंदे साहेबांनी विरोधी बाकावर बसण्याचा आदेश दिला, तर शिवसेना सक्षम विरोधी पक्षाची भूमिका बजावेल, असेही त्यांनी सांगितले.
गिरीश महाजन यांच्या एका वक्तव्यामुळे नाशिक महापालिकेचे राजकारण चांगलेच तापले असून, भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील हा तणाव पुढे कोणते वळण घेणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.






















