Times Of Maharashtra : बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे गेल्या तीन दशकांपासून कार्यरत असलेले बीड पाटबंधारे प्रकल्पाचे सर्कल कार्यालय परभणी येथे स्थलांतरित होण्याची शक्यता बळावली असून, यामुळे परळीतील राजकीय व सामाजिक वर्तुळात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. हे कार्यालय तत्कालीन उपमुख्यमंत्री लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या विशेष प्रयत्नातून परळीत आणण्यात आले होते. मात्र आता प्रशासकीय पुनर्रचनेच्या नावाखाली हे कार्यालय हलवण्याचा निर्णय घेतला जात असल्याचा आरोप होत आहे.
या सर्कल कार्यालयाअंतर्गत बीड, लातूर आणि परभणी या तीन जिल्ह्यांतील पाटबंधारे प्रकल्पांचा कारभार चालतो. भौगोलिकदृष्ट्या परळी हे तिन्ही जिल्ह्यांसाठी मध्यवर्ती ठिकाण असल्याने शेतकरी, अधिकारी व प्रशासनासाठी हे कार्यालय परळीत असणे सोयीचे होते. असे असतानाही कार्यालय परभणीला हलवण्याचा निर्णय घेतला जात असल्याने परळीचे प्रशासकीय महत्त्व कमी करण्याचा डाव असल्याची भावना नागरिकांत निर्माण झाली आहे.
सामाजिक कार्यकर्ते बालाजी गायकवाड यांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला आहे. यापूर्वी परळीतील ऊसतोड कामगार महामंडळाचे कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे, तर महावितरणचे परिमंडळ कार्यालय लातूर येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. आता पाटबंधारे विभागाचे सर्कल कार्यालयही हलवले जात असल्याने परळी हळूहळू प्रशासकीय केंद्र म्हणून दुर्लक्षित होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
यापूर्वी पंकजा मुंडे, धनंजय मुंडे आणि प्रीतम मुंडे यांनी हे कार्यालय परळीतच ठेवण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र तरीही स्थलांतराची प्रक्रिया सुरू झाल्याने नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे. पाटबंधारे सर्कल कार्यालय परळीतून हलवू नये, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली आहे.






















