Times Of Maharashtra Desk : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज देशाचा नववा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात सोने व चांदीवरील आयात शुल्क किंवा जीएसटी कमी होईल, अशी अपेक्षा ग्राहकांपासून सराफांपर्यंत सर्वांनाच होती. मात्र, अर्थसंकल्पात सोने-चांदीबाबत कोणतीही घोषणा न झाल्याने दरांवर थेट परिणाम झाला नसल्याचे चित्र आहे.
अर्थसंकल्पात कोणताही निर्णय न घेतला गेल्यामुळे सोने आणि चांदीचे दर सध्याच्या पातळीवरच कायम राहतील, असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. तथापि, आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे आज पुन्हा एकदा सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली.
मध्यमवर्गी माणूस सुखावला-गुंतवणुकदारांचा अपेक्षाभंग
गेल्या दोन दिवसांत सोने आणि चांदीच्या दरात लक्षणीय घसरण झाली आहे. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला असला, तरी गुंतवणूकदारांना मोठा आर्थिक फटका बसल्याचे चित्र आहे. केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर सोने-चांदीवरील करांबाबत कोणतीही नवी तरतूद नसल्याने दरांवर त्याचा थेट परिणाम झाला नसला, तरी जागतिक बाजारातील दबावामुळे घसरण सुरूच आहे.
काल जीएसटीसह सोन्याचा दर १ लाख ६० हजार रुपये प्रति तोळा होता. मात्र, आज तब्बल ५ हजार रुपयांची घसरण होऊन सोन्याचा दर १ लाख ५५ हजार रुपये झाला आहे. तर चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली असून, ३० हजार रुपयांनी घट होऊन चांदीचे दर २ लाख ७० हजार रुपयांच्या खाली आले आहेत.
१ फेब्रुवारी २०२६ रोजी अर्थसंकल्पाच्या दिवशीही सोन्या-चांदीच्या दरात घसरण नोंदवण्यात आली. स्पॉट मार्केटमध्ये चांदीचा दर २ लाख ६५ हजार ६०० रुपये इतका झाला आहे. काही दिवसांपूर्वी चांदीने ४ लाख २० हजार रुपयांचा उच्चांक गाठला होता. मात्र, ज्या वेगाने दर वाढले होते, त्याच वेगाने ते खाली आले असून, चांदीचे दर जवळपास १ लाख ३४ हजार रुपयांनी घसरले आहेत.
केंद्र सरकारकडून अर्थसंकल्पात सोने-चांदीवरील आयात शुल्क कमी केले जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र, तसे न झाल्याने बाजारात निराशा आहे. गेल्या काही दिवसांत दर वाढत असल्याने गुंतवणूकदारांकडून गोल्ड आणि सिल्व्हर ईटीएफमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जात होती. मात्र, आज ईटीएफमध्येही घसरण पाहायला मिळाली आहे.दरम्यान, सोन्या-चांदीच्या किमती घसरल्याने सामान्य ग्राहकांनी समाधान व्यक्त केले असले, तरी बाजारातील अस्थिरता कायम असल्याने पुढील काळात दरांमध्ये चढ-उतार सुरूच राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.






















