गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : गेवराई तालुक्यातील मिरगाव येथे अत्यंत दुर्दैवी अपघातात नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. शेतात कांदे भरत असताना ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा तोल जाऊन ट्रॉली अंगावर पडल्याने विश्वजीत शरद पराड (वय अंदाजे १५ वर्षे) याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या उन्हाळ्याची सुट्टी सुरू असल्याने विश्वजीत शेतात गेला होता. मिरगाव परिसरातील एका शेतात ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये कांदे भरण्याचे काम सुरू होते. प्रखर उन्हामुळे विश्वजीत ट्रॉलीखाली सावलीत बसला होता.
दरम्यान, ट्रॉलीच्या मागील बाजूस मोठ्या प्रमाणात कांदे भरल्याने वजनाचा समतोल बिघडला. त्यामुळे ट्रॉलीचा पुढील भाग अचानक वर उचलला गेला आणि ट्रॉली पलटी होऊन थेट विश्वजीतच्या अंगावर पडली.
या भीषण अपघातात विश्वजीतचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. या दुर्घटनेमुळे मिरगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.






















