परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) : गंगाखेड तालुक्यातील पेडजाई देवी जवळ सातशे वर्षापुर्वीचे ऐतिहासिक अवशेष दि.११ मे रोजी आढळून आले. प्राचीन कालखंडा पासूनच महाराष्ट्रात आदि शक्तीची उपासना मोठ्या प्रमानावर केली जाते. साडेतीन शक्ती पिठांचा इतिहास तर सर्वश्रुतच आहे. याच देवींच्या साडेतीन शक्ती पिठांपैकी माहूरच्या रेणुका देवीचे उपपीठ म्हणुन राणीसावरगावचे रेणुका देवीचे ठिकाण प्रसिद्ध आहेच पण याच देवीच्या समकालीन गंगाखेड च्या दक्षिणेस टोकवाडी पासून पाचशे मीटर अंतरावर आणि मासोळी धरणाच्या उत्तरेस दोन कि.मी अंतरावर एका उंच टेकडीवर निसर्गरम्य स्थळी “पेडजाई” देवीचे ठाणे विराजमान आहे. हे ठिकाण मात्र काल ओघात आजपर्यत दुर्लक्षितच राहिले. सभोवतालच्या बारा वाड्या आणि इसाद गावापुरती याची ओळख मर्यादित राहिली.
हे ऐतिहासिक नुकसान कधीही भरून निघणार नाही. गंगाखेड चे माजी नगरसेवक श्री तुकारामजी तांदळे यांच्या आग्रहास्तव परभणी जिल्हा ऐतिहासिक वारसा समिती सदस्य तथा शेषाबाई मुंढे महाविद्यालयातील इतिहासतज्ञ प्रा. डॉ. अविनाश खोकले यांनी “पेडजाई”देवीच्या टेकडीवर भेट दिली. आणि बारकाईने अभ्यास पुर्ण निरीक्षण केले. तेंव्हा या ठिकाणी साधारणतः सातशे वर्षांपूर्वीच्या मंदिराचे ऐतिहासिक भग्न अवशेष आढळून आले.या ठिकाणी तेराव्या शतकातील एक काळ्या बेसाल्ट पाषाणातील बास्तुशास्त्रीय दृष्टीकोनातून महत्त्वपूर्ण असे मंदीर होते हे तेथील भग्न अवशेषांवरून आणि त्यावरील कला कुसर पाहिल्यास समजते.


मूळ मंदिराची रचना गर्भगृह, अंतराळ आणि सभामंडप अशी होती. मंदीर पूर्वाभिमुख होते. आजही मंदिरातील मुख्य देवतेचे मूळ आसनपीठ, चंद्रशिळा, आणि स्तंभांचे अवशेष सुस्थितीत आहेत. मंदिरापासून पूर्वेस पाचशे मीटर अंतरावर एक छोटेसे काळ्या दगडात बांधलेले जलकुंड आहे.जलकुंड बांधण्यासाठी इतर कसल्याच साहित्याची मदत घेतली नाही.कुंडाची खोली फक्त दहा फूट असून त्यामध्ये आजही अशा कडक मे महिन्याच्या उन्हाळ्यातही पाणी आहे. या कुंडाविषयी, रानुबाई विषयी आणि पेडजाई विषयी लोक परंपरेने अनेक मौखिक लोककथा समाजात प्रचलित ठेवल्या आहेत.राणीसावरगाव च्या रेणूका देवीचा आणि पेटजाई देवीच्या मूळ मंदिराच्या बांधणीचा एकच काळ होता. पेडजाईचे पूर्वीचे मुळ मंदिर दोनशे वर्षापूर्वी पूर्णतः भग्न पावले आहे.
नंतर त्याच जागेवर दगड आणि विटांचे चुना मातीच्या साहाय्याने दूसरे गर्भगृह आणि लादणी. वजा टोप असलेले सभा मंडप उभारले आहे. या आधुनिक गर्भगृहाच्या शिखरावर इंडो – इस्लामिक बांधकाम शैलीचा प्रभाव दिसुन येतो. गर्भ गृहातील आसन पीठावर देवीचा एक मोठा आणि एक छोटा असे दोन तांदळे आहेत. हे तांदळे सुद्धा महाराष्ट्रातील इतर देवींच्या तुलनेत आपले वेगळेपण जपून आहेत.हे माञ प्रत्यक्ष पाहून अनुभव घेतल्या शिवाय समजणार नाही.
येथील सर्व ऐतिहासिक पाऊल खूना पाहून
हे अवशेष कदाचित आपला वैभवशाली ऐतिहासिक वारसा जगाला सांगण्यासाठी जिवंत राहिले असावेत असे मत डॉ.अविनाश खोकले यांनी मांडले.
मंदिराच्या सभोवती चहू दिशांना सहज पाहिले तर पंचवीस कि. मी. च्या अंतराची टेहळणी अगदी स्पष्टपने करता येते. या उंच टेकडीच्या पोटाशी सुरू असलेले खोदकाम प्रशासन स्तरावर थांबवले पाहिजे जेणेकरून टेकडीचे नैसर्गिक सौंदर्य टिकून राहील.या ठिकाणी पुरातत्व विभागाने अगदी कटाक्षाने लक्ष घालुन मंदिराचे पूनर निर्माण केले तर एक सुंदर आणि अविस्मरणीय असे सांस्कृतिक, धार्मिक आणि ऐतिहासीक पर्यटन स्थळ होऊ शकते आणि पूर्व वैभव प्राप्त होऊ शकते यात दुमत नसावे. पाहणी दरम्यान सरपंच प्रकाश नागरगोजे, देवीचे पुजारी गंगाधर सूर्यवंशी चंदन लटपटे उपस्थित होते.






















