पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : गणेश नारंग
Times of Maharashtra Desk: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुका जवळ येत असताना काळेवाडी प्रभाग क्रमांक २२ मध्ये भाजपच्या स्थानिक संघटनेत हालचाली वाढल्या आहेत. अद्याप उमेदवारांची अधिकृत घोषणा झालेली नसली, तरी बाहेरून उमेदवार देण्याच्या सुरू असलेल्या चर्चांमुळे पक्षातील जुने, निष्ठावंत कार्यकर्ते अस्वस्थ झाल्याचे चित्र आहे. या चर्चांना वेळीच पूर्णविराम द्यावा आणि स्थानिक कार्यकर्त्यांनाच संधी द्यावी, अशी जोरदार मागणी पुढे येत आहे.
पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी अनेक वर्षांपासून काम करणारे कार्यकर्ते सांगतात की, निवडणूक काळात केवळ प्रचार, नियोजन आणि मैदानात काम करण्यापुरतेच आम्हाला मर्यादित ठेवले जाते का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. स्थानिक पातळीवर जनतेशी थेट संपर्क असलेले, विश्वासार्ह आणि सक्रिय कार्यकर्ते असताना बाहेरील उमेदवारांच्या चर्चांमुळे निराशा पसरत आहे.
निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मते, उमेदवारी ठरवताना केवळ निवडणुकीतील गणित नव्हे, तर संघटनेची निष्ठा, सातत्यपूर्ण काम आणि स्थानिक स्वीकारार्हता या बाबीही महत्त्वाच्या आहेत. बाहेरून उमेदवार दिल्यास कार्यकर्त्यांमधील उत्साह कमी होण्याची शक्यता असून, त्याचा परिणाम प्रचार यंत्रणेवर होऊ शकतो, असा इशाराही दिला जात आहे.
दरम्यान, पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने अंतिम निर्णय घेण्यापूर्वी स्थानिक संघटनेशी सखोल चर्चा करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. सध्या केवळ चर्चा सुरू असली तरी योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यास संभाव्य नाराजी टाळता येईल आणि निवडणुकीत पक्ष अधिक ताकदीने उतरू शकेल, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.






















