Times of Maharashtra Desk: मुळशी तालुक्यातील मौजे भादस बुद्रुक येथील सर्वे नं. १७२ मधील अनधिकृत माती उत्खनन प्रकरणाच्या पुनर्पंचनाम्यादरम्यान सरकारी कामात अडथळा आणल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून, याप्रकरणी संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
सन २०२३ मध्ये सदर ठिकाणी झालेल्या अनधिकृत उत्खननासंदर्भात दिनांक १५ मे २०२३ रोजी गावकामगार तलाठी यांनी पंचनामा केला होता. त्यानंतर तहसीलदार मुळशी यांनी उत्खननास जबाबदार असलेल्या व्यक्तीकडून सुमारे १० लाख ६८ हजार रुपयांची वसुली करण्याचे आदेश दिले होते.मात्र या प्रकरणात संदीप ज्ञानोबा जोरी यांचे नाव चुकीच्या पद्धतीने आदेशात समाविष्ट झाल्याचा आरोप करण्यात आला. जोरी यांनी आपण संबंधित जागेचे उत्खनन केलेले नसल्याचे पुरावे सादर केल्यानंतर प्रकरण पुनर्वलोकनासाठी उपविभागीय अधिकारी मावळ-मुळशी यांनी आदेश दिले.
त्याअनुषंगाने दिनांक ८ डिसेंबर २०२५ रोजी मंडल अधिकारी सावरगाव, तलाठी, कोतवाल, पोलीस पाटील व इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत फेर पंचनामा सुरू असताना संतोष विठ्ठल जोरी हे घटनास्थळी आले. संबंधित व्यक्तीचा त्या जमिनीशी कोणताही कायदेशीर संबंध नसताना त्यांनी पंचनाम्यात हस्तक्षेप केल्याचा आरोप आहे.तक्रारीनुसार, संतोष जोरी यांनी पंचनाम्यादरम्यान संदीप जोरी यांच्याशी धक्काबुक्की व शिवीगाळ करत सरकारी कामात अडथळा आणला, त्यामुळे पंचनामा थांबवावा लागला. यामुळे शासकीय प्रक्रियेला अडथळा निर्माण झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
1) या घटनेबाबत संदीप जोरी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल करून,
2) सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा,
3) भविष्यात शासकीय अधिकारी व नागरिकांना संरक्षण मिळेल अशी कार्यवाही करावी,
4) संबंधित व्यक्तीला घटनास्थळी कोणी व कोणत्या हेतूने बोलावले याची स्वतंत्र चौकशी करावी,
अशी मागणी केली आहे.
प्रकरणाची गंभीर दखल घेऊन प्रशासन पुढील काय कारवाई करते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.






















