Times of Maharashtra Desk: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणांमध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने थेट युती जाहीर केल्याने महाविकास आघाडीला मविआ मोठा धक्का बसला आहे. या अनपेक्षित घडामोडीनंतर ठाकरे गटाकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
ठाकरे गटाच्या शिवसेनेचे पिंपरी-चिंचवड जिल्हाप्रमुख व माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांनी शरद पवार गटावर जोरदार टीका केली आहे. “महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही पवार साहेबांवर विश्वास ठेवला होता. गेल्या तीन-चार महिन्यांत अनेक बैठका झाल्या. पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक एकत्र लढवण्यावरही सहमती झाली होती. मात्र अचानक घेतलेला हा निर्णय म्हणजे मविआला दिलेला धक्काच आहे,” असे गौतम चाबुकस्वार यांनी सांगितले.
जागावाटपावर चर्चा होऊनही युती तुटली
“महाराष्ट्रात जशी महाविकास आघाडी आहे, तशीच ती पिंपरी-चिंचवडमध्येही असावी, ही आमची ठाम भूमिका होती. त्यानुसार जागावाटपावरही चर्चा झाली होती. मात्र दुर्दैवाने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या आणि मविआचे गणित कोलमडले.” असे गौतम यांचे म्हणणे आहे.
‘आमची फसवणूक झाली’ – ठाकरे गटाचा आरोप
शरद पवार गटाच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करत गौतम चाबुकस्वार म्हणाले, “शेवटपर्यंत आमच्याशी चर्चा सुरू होती आणि दुसरीकडे अजित पवारांशी युती करत आमची फसवणूक करण्यात आली. हा विश्वासघात आहे.” या राजकीय धक्क्यानंतर ठाकरे गटाने पुढील रणनीती आखण्यास सुरुवात केली असून, “मविआचा प्लॅन ‘ए’ फोल ठरला आहे. त्यामुळे आता शरद पवार गटाला वगळून प्लॅन ‘बी’ तयार करण्यात येत आहे,” अशी माहितीही त्यांनी दिली.
भाजप–शिंदे शिवसेना युतीबाबत अनिश्चितता कायम
दरम्यान, उमेदवारी अर्ज भरण्यास काही तास उरले असतानाही पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेतील युतीची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. मात्र भाजपचे 128 जागांसाठीचे सर्व एबी फॉर्म प्रदेश कार्यालयातून पोहोचले असून, भाजपने याला दुजोरा दिला आहे.
शिंदे शिवसेनेसोबत जागावाटपावरून रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र आहे. युती तुटल्यास भाजप आणि रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील आरपीआय एकत्र निवडणूक लढवणार आहेत. आरपीआयचे उमेदवार कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार, हे आधीच ठरलेले आहे. शिंदे शिवसेनेने अधिक घासाघीस केल्यास भाजप सर्व 128 जागांवर स्वबळावर लढण्यास सज्ज असल्याचा स्पष्ट संदेश दिला आहे.






















