Times of Maharashtra Desk, Pune: माहिती तंत्रज्ञान, उच्चभ्रू निवासी वस्त्या आणि लोहगाव विमानतळाचे सान्निध्य यामुळे पुणे शहराचा ग्रोथ कॉरिडॉर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रभाग क्रमांक ३ लोहगाव-विमाननगर मध्ये विकासाचा वेग आणि पायाभूत सुविधांमधील दरी गंभीर बनली आहे. या प्रभागाची लोकसंख्या ९२,४१० इतकी आहे. यापैकी अनुसूचित जातीतील नागरिकांची संख्या १०,०८२असून १,०१७ इतकी संख्या अनिसुचीत जमातींची आहे. एकीकडे हा भाग कोट्यवधींची गुंतवणूक आकर्षित करत असताना, दुसरीकडे येथील नागरिक तीव्र पाणीटंचाई, नित्याची वाहतूक कोंडी आणि आता कचरा व्यवस्थापनातील नव्या सामाजिक संघर्षाने त्रस्त आहेत.
राजकीय वर्चस्व, पण अंमलबजावणीचे काय?
२०१७ च्या महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग ३ मध्ये भारतीय जनता पक्षाने एकछत्री वर्चस्व मिळवत चारही जागा जिंकल्या होत्या. हा प्रभाग ज्या वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात येतो तेथेही भाजपचेच प्राबल्य आहे. मात्र राजकीय पकड मजबूत असूनही नागरिकांच्या मूलभूत समस्या वर्षानुवर्षे प्रलंबित राहिल्याने विद्यमान नेतृत्वावर नागरिकांच्या असंतोषाचा दबाव वाढत आहे.
पाणीबाणीचे मूळ भामा-आसखेडमध्ये
प्रभागातील पाणीटंचाई ही केवळ तांत्रिक अडचण नसून धोरणात्मक विलंबाचा थेट परिणाम आहे. विमाननगर, वडगावशेरी, खराडीसह संपूर्ण पूर्व पुण्याची तहान भागवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात सुरू झालेला भामा-आसखेड जलप्रकल्प गेल्या पाच वर्षांपासून स्थानिक ग्रामस्थांच्या विरोधामुळे रखडलेला आहे.
प्रशासन सध्या विमाननगर टाकीच्या व्हॉल्व्ह दुरुस्तीसारखी तात्पुरती मलमपट्टी करत असले तरी, राजकीय आणि प्रशासकीय समन्वयाच्या अभावामुळे हा धोरणात्मक प्रकल्प रखडल्याचा फटका थेट नागरिकांना बसत आहे.
वाहतूक कोंडी: निधी मंजूर, पण कामे प्रलंबित
प्रभाग ३ पुणे-अहिल्यानगर रस्त्याला लागून असल्याने येथील वाहतूक कोंडी हा नागरिकांसाठी रोजचा चिंतेचा विषय आहे. विमाननगर आणि वडगावशेरी येथे फ्लायओव्हर आणि अंडरपास बांधण्याची मागणी गेल्या पाच वर्षांपासून होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, स्थानिक आमदारांच्या प्रयत्नातून या कामांसाठी निधी मंजूर होऊनही प्रशासकीय दिरंगाईमुळे किंवा इच्छाशक्तीच्या अभावामुळे प्रत्यक्ष कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. निधी पडून असूनही कामे न झाल्याने नागरिकांचा संताप वाढत आहे.
‘विश्वास २०२५’ आणि विस्थापितांचा आक्रोश
पाणी आणि वाहतूक या जुन्या समस्या कायम असतानाच महापालिकेच्या ‘विश्वास २०२५’ या कचरा व्यवस्थापनाच्या आधुनिकीकरण पायलट प्रकल्पाने नवा सामाजिक संघर्ष निर्माण केला आहे. विमाननगरमध्ये हा पायलट प्रकल्प १ सप्टेंबर २०२५ पासून सुरू करण्यात आला. विमानतळाजवळ कचरा साठल्याने होणारे बर्ड हिट्स टाळणे आणि परिसर स्वच्छ करणे हे प्रशासनाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
मात्र, या यांत्रिकीकरणामुळे दोन दशकांपासून घरोघरी कचरा गोळा करणाऱ्या ‘स्वच्छ’ या कचरा वेचकांच्या सहकारी संस्थेवर आणि तिच्या कामगारांवर विस्थापनाची कुऱ्हाड कोसळली आहे.
विमाननगरमधील सुमारे १५ ते १६ ‘स्वच्छ’ कर्मचाऱ्यांना १६ सप्टेंबरपासून वेतन मिळालेले नाही, ज्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यांत्रिकीकरणामुळे अनेक कामगारांचे मासिक उत्पन्न सुमारे २५,००० वरून थेट १८,००० पर्यंत घसरले आहे.
शहरातील सुमारे ४,००० कचरा वेचक कायमस्वरूपी विस्थापनाच्या भीतीने चिंतेत आहेत. ज्यापैकी बहुसंख्य महिला कुटुंबप्रमुख आहेत.
विकासाचा फुगा फुटणार?
एकीकडे लोहगाव विमानतळाचा विस्तार प्रस्तावित आहे, तर दुसरीकडे लोहगाव आणि खराडीमध्ये रिअल इस्टेटचा बूम आला आहे. यामुळे भविष्यात या भागावरचा ताण आणखी वाढणार हे निश्चित आहे.
जर भामा-आसखेडसारखे रखडलेले प्रकल्प युद्धपातळीवर पूर्ण केले नाहीत, निधी मंजूर असलेले रस्ते प्रकल्प तातडीने सुरू केले नाहीत आणि स्वच्छ कामगारांसारख्या घटकांचे न्यायपूर्ण पुनर्वसन केले नाही, तर प्रभाग ३ चा हा विकसित चेहरा पायाभूत सुविधांच्या अभावामुळे कोलमडून पडेल. हे मात्र निश्चित आहे.






















