Times of Maharashtra Desk: पुणे महानगरपालिका निवडणूक विविध वाद आणि घडामोडींमुळे राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे. भाजपकडून उमेदवारी नाकारल्यानंतर अमोल बालवडकर यांनी थेट अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत उमेदवारी मिळवली, तर भाजपने या जागेसाठी लहू बालवडकर यांना उमेदवारी दिली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते व मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे महापालिका निवडणुकीबाबत मोठे भाकीत केले आहे.
लहू बालवडकर यांच्या प्रचारादरम्यान बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “मी आज भविष्यवाणी करतो की महाराष्ट्रातील सर्वाधिक मतं घेऊन जो नगरसेवक निवडून येईल, तो लहू बालवडकर असेल.” त्यांनी आपल्या मागील निवडणुकांमधील अंदाजांचा उल्लेख करत आपल्या भविष्यवाण्या आजवर अचूक ठरल्याचा दावा केला.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, “जेव्हा-जेव्हा निवडणुका येतात, तेव्हा मोठे-मोठे नेते मला विचारतात ‘दादा, काय होईल?’ आणि मी जे सांगतो ते खरं ठरतं. २०१७ साली मी मुंबई महापालिकेत ८२ जागा येतील असं सांगितलं होतं आणि तितक्याच जागा आल्या.”
बालेवाडी प्रभागाबाबत बोलताना त्यांनी ठाम विश्वास व्यक्त केला की, “लहू बालवडकर हे बालेवाडीमध्ये सर्वाधिक मतांनी निवडून येतील. लिहून ठेवा, महाराष्ट्रात सर्वाधिक मतं मिळवणारे नगरसेवक लहू बालवडकरच असतील.”लहू बालवडकर यांचं नाव ईव्हीएमवर चौथ्या क्रमांकावर असलं, तरी त्याचा निकालावर कोणताही परिणाम होणार नाही, असं सांगत पाटील म्हणाले, “घोडा मैदान लांब नाही. निकालाच्या दिवशी चित्र स्पष्ट होईल.”चंद्रकांत पाटील यांच्या या विधानामुळे पुणे महापालिका निवडणुकीतील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता असून, आता मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






















