Times Of Maharashtra Desk : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या बारामतीतील विमान दुर्घटनेप्रकरणी गंभीर प्रश्न उपस्थित करत या घटनेची राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर त्यांनी दिल्लीतही माध्यमांशी संवाद साधत अपघातामागे घातपाताची शक्यता नाकारता येत नसल्याचे म्हटले.
रोहित पवार यांनी सांगितले की, अजित पवार जर विमानाऐवजी रस्त्याने प्रवास केला असता तर ही दुर्दैवी घटना टळली असती. दुर्घटनेपूर्वी काही घडामोडी संशयास्पद असल्याचा दावा त्यांनी केला. संबंधित फाईल मुद्दाम आणली गेली का, फाईलवर स्वाक्षरी झाल्यानंतर सायंकाळी ७.१३ वाजता विमानाचे बुकिंग का झाले, याची चौकशी व्हावी, असे ते म्हणाले. आपण कोणावर थेट आरोप करत नसून सत्य बाहेर यावे हीच भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी शेकडो कोटींच्या कंत्राटावरून वाद झाल्याचा गौप्यस्फोट केला. एका पॉलिटिकल कन्सल्टंटचे कंत्राट रद्द करण्याबाबत चर्चा झाली होती, त्यावरून वाद निर्माण झाला आणि त्यामुळे उशीर झाल्याचा दावा त्यांनी केला. बारामतीत नरेश अरोरा यांच्या कंत्राटासंदर्भातही मतभेद होते, असे सांगत काही वरिष्ठ नेत्यांनी ते कंत्राट कायम ठेवण्याचा आग्रह धरला होता, असा आरोप त्यांनी केला. अप्रत्यक्षपणे त्यांनी सुनील तटकरे यांच्याकडे बोट दाखवले.
प्रमोद हिंदुराव यांच्या व्हिडिओचाही उल्लेख करत रोहित पवार म्हणाले की, प्रफुल्ल पटेल यांच्या फोनमुळे फाईल आणण्यात उशीर झाल्याचे सांगितले गेले. काही नेते अजित पवार यांच्या बाजूने बोलत नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
दिल्ली दौऱ्यात केंद्रीय गृहमंत्री व नागरी विमान वाहतूक मंत्र्यांची भेट न मिळाल्याचे सांगत त्यांनी ई-मेलद्वारे पत्र पाठविणार असल्याचे स्पष्ट केले. ब्लॅक बॉक्समधील नोंदींबाबत स्पष्ट माहिती द्यावी, अशी मागणी करत ही घटना अपघात की घातपात” याचा पारदर्शक आणि क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशनद्वारे तपास व्हावा, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. डीजीसीएचा तपास सुरू असला तरी एका महिन्यात आंतरराष्ट्रीय यंत्रणेमार्फत स्वतंत्र चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.






















