गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : गेवराई तालुक्यातील भडंगवाडी येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात सुरू असून भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. या सप्ताहात बोलताना सुप्रसिद्ध रामायणाचार्य ह.भ.प. रामराव महाराज ढोक यांनी संतांच्या सानिध्यात राहून भगवंताचे नामस्मरण केल्यास जीवनातील खरे सुख प्राप्त होते, असे प्रतिपादन केले.

स्वानंद सुखनिवासी संत कुलभूषण महात्मा श्री नगद नारायण महाराज यांच्या कृपेने आयोजित या सप्ताहाच्या सातव्या दिवशी कीर्तनरूपी पुष्प गुंफताना त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी श्रीक्षेत्र नारायणगडाचे उत्तराधिकारी संभाजी महाराज यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच पंचक्रोशीतील टाळकरी, वारकरी, भजनी मंडळ, गायक-वादक आणि महिला-पुरुष भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
रामराव महाराज पुढे म्हणाले की, मोह, माया, मद, मत्सर, द्वेष आणि चिंता हे मनाचे सहा प्रमुख शत्रू आहेत. हे विकार माणसाला प्रगती व शांतीपासून दूर नेतात आणि दुःखाचे कारण बनतात. त्यामुळे प्रत्येकाने भगवंताचे नामस्मरण करून मन शुद्ध ठेवावे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी संत तुकोबारायांच्या अभंगावर सुंदर विवेचन करत नामस्मरणाचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच पत्रकारांच्या कार्याचे कौतुक करत समाजात सकारात्मक विचार पोहोचविण्यात त्यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे नमूद केले.
भडंगवाडी लहान गाव असले तरी सर्वांच्या एकोप्यामुळे सप्ताह भव्यदिव्य स्वरूपात पार पडत असल्याचा आनंद यावेळी व्यक्त करण्यात आला.



















