Times of Maharashtra Desk: साताऱ्यातील महाबळेश्वर परिसरातील सावरी गावात काही दिवसांपूर्वी सुमारे 145 कोटी रुपयांचा ड्रग्ज साठा सापडल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे. या ड्रग्ज साठ्याची जागा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बंधू प्रकाश शिंदे यांच्या मालकीची असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे.या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्टपणे पाठराखण केली. विरोधक जाणीवपूर्वक एकनाथ शिंदे यांचे नाव या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका त्यांनी केली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “साताऱ्यात पोलिसांनी धाड टाकून इतक्या मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज जप्त केले, त्याबद्दल मी सर्वप्रथम पोलीस दलाचे अभिनंदन करतो. बेकायदेशीर धंद्याचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे. मात्र, या प्रकरणात जाणीवपूर्वक एकनाथ शिंदे यांचे नाव आणण्याचा प्रयत्न चुकीचा, अयोग्य आणि निषेधार्ह आहे. आतापर्यंत समोर आलेल्या पुराव्यांमध्ये एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबीयांचा कोणताही थेट संबंध आढळून आलेला नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.”
याचवेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भातही थोडक्यात भाष्य केले. “माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. त्यांच्या खात्यांची जबाबदारी आता अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, कोकाटे यांच्या आमदारकीचा राजीनामा किंवा अटक वॉरंट याबाबत त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर देताना सुषमा अंधारे यांनी जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या, “मुख्यमंत्र्यांनी स्वतः न्यायाधीश होण्याचा प्रयत्न करू नये. संविधानाने न्यायव्यवस्था दिली आहे आणि कोण बरोबर, कोण चूक हे ठरवण्याचे अधिकार न्यायालयांकडे आहेत. जर मुख्यमंत्र्यांनीच क्लीन चिट द्यायची असेल, तर सगळी न्यायालयं बंद करा.”
अंधारे पुढे म्हणाल्या, “मी एकनाथ शिंदे यांचा थेट संबंध असल्याचे म्हटलेले नाही. माझा आरोप त्यांच्या बंधू प्रकाश शिंदे यांच्याबाबत आहे. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असल्याचा फायदा प्रकाश शिंदेंना होऊ शकतो आणि त्यामुळे तपासावर प्रभाव पडण्याची शक्यता आहे. म्हणूनच काही काळ एकनाथ शिंदे यांनी पदापासून दूर राहावे, ही माझी मागणी आहे.”सातारा ड्रग्ज प्रकरणामुळे राज्यातील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत असून, आता सर्वांचे लक्ष पोलिस तपास आणि पुढील कायदेशीर कारवाईकडे लागले आहे.






















