Times of Maharashtra Desk: नाशिक सत्ताधारी मुंबईत बसून एकत्र वडापाव खातात आणि निवडणुका आल्या की वेगवेगळे होतात, असा घणाघाती आरोप करत एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मालेगाव येथे एमआयएमच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. सत्ताधाऱ्यांचा कचरा उचलून फेका, तेव्हाच मालेगावची खरी प्रगती होईल, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.
ओवैसी म्हणाले, मालेगावमधील कचरा कंत्राट सत्ताधाऱ्यांकडेच असून शहरातील घाण आणि भ्रष्टाचार यांना तेच जबाबदार आहेत. “मालेगाव साफ ठेवायचा असेल तर सत्ताधाऱ्यांना कचऱ्यासारखे उचलून फेका आणि एमआयएमला साथ द्या, असे त्यांनी ठणकावून सांगितले. मालेगावच्या पॉवरलूम उद्योगावर सध्या मोठे संकट आले असून अमेरिकेच्या टॅरिफ धोरणामुळे उद्योग अडचणीत सापडला आहे. मात्र, गेल्या १५ वर्षांत विरोधकांनी केवळ लूटमार केली, असा आरोप त्यांनी केला.
अजित पवार यांच्यावर टीका करताना ओवैसी म्हणाले, अजित पवार जे शरद पवारांचे झाले नाहीत, ते तुमचे काय होतील? भाजपविरोधात एक वाक्य बोलले की संध्याकाळपर्यंत ते माघार घेतात, असा टोला त्यांनी लगावला. नाव न घेता त्यांनी स्थानिक नेत्यांवरही निशाणा साधत, तुमचा इथला प्यादा चारों खाने चित होईल,असे म्हटले.
मालेगाव महापालिकेच्या मोठ्या बजेटवर प्रश्न उपस्थित करत ओवैसी म्हणाले, हे पैसे नेमके कुठे जातात? सत्ताधारी रक्त पिण्याचे काम करत आहेत. एमआयएमची सत्ता आली तर तीन वर्षांत महापालिकेची स्थिती सुधारू, मालेगावसाठी व्हिजन प्लॅन तयार केला जाईल, असा दावा त्यांनी केला. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे सत्ताधारी मुंबईत एकत्र असतात, पण निवडणुकांच्या वेळी वेगवेगळे होतात, असा आरोपही त्यांनी केला.
भाजपच्या एका नेत्याकडून बनावट जन्म दाखल्याच्या मुद्द्यावरून मालेगावची बदनामी केली जात असल्याचा आरोप करत, “आपला महापौर बसला की सगळ्यांचा हिशेब होईल, असा इशारा ओवैसी यांनी दिला. सरकारमध्ये मुस्लिमांचे प्रतिनिधित्व कमी असल्याने शिक्षण घ्या आणि एमआयएमला साथ द्या, असे आवाहन करत त्यांनी महिलांवरील अन्याय, मुलांच्या शिक्षणाच्या समस्या आणि गेल्या १५ वर्षांपासून सुरू असलेल्या गुंडाराजावरही तीव्र टीका केली. हा गुंडाराज संपवायचा असेल तर एमआयएमला निवडून द्या, असे आवाहन करत त्यांनी आपले भाषण संपवले.






















