जळगाव ( प्रतिनिधी विनोद पवार) : जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणाऱ्या शेळगाव बॅरेज मध्यम प्रकल्पाला राज्य शासनाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. जलसंपदा विभागाने या प्रकल्पासाठी तब्बल 1407.02 कोटी रुपयांची तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता दिली असून, अनेक वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पाला आता गती मिळणार आहे.
तापी नदीवर उभारण्यात येणारा हा बॅरेज प्रकल्प यावल तालुक्यासाठी जीवनदायी ठरणार असल्याचे मानले जात आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून तालुक्यातील सिंचन व्यवस्थेत मोठा बदल घडणार असून, शेतीसाठी पाण्याचा दीर्घकालीन प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या प्रकल्पामुळे यावल तालुक्यातील सुमारे 11 गावांतील 1228 हेक्टर क्षेत्रासह एकूण 9,128 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना वर्षभर पाणी उपलब्ध होईल आणि पिकांच्या उत्पादनात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. परिणामी, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार आहे.
शेळगाव बॅरेज प्रकल्पाला मंजुरी मिळाल्याने स्थानिक शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक वर्षांपासून या प्रकल्पाची प्रतीक्षा केली जात होती. आता प्रशासकीय मान्यता मिळाल्यामुळे प्रत्यक्ष कामाला वेग येईल आणि प्रकल्प लवकर पूर्ण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या प्रकल्पाचे काम वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण व्हावे, तसेच शेतकऱ्यांना त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळावा, यासाठी प्रशासनाने विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे मतही जाणकारांकडून व्यक्त होत आहे.
तसेच यावल तालुक्यातील इतर प्रलंबित सिंचन प्रकल्पही लवकरात लवकर सुरू करण्यात यावेत, जेणेकरून संपूर्ण तालुक्यातील शेती सुजलाम-सुफलाम होईल, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर जळगाव जिल्ह्याच्या कृषी विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.






















