पुणे (संपादक मुज्जम्मील शेख): पुण्यातील कोंढवा भागातून कॅम्पकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर गोळीबार मैदान चौक परिसरात मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. सोलापूर बाजार चौकीपासून गोळीबार मैदानापर्यंत रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून नागरिकांना दररोज वाहतूक कोंडी व अपघाताच्या धोक्याचा सामना करावा लागत आहे.
या संदर्भात नागरिकांनी कॅन्टोन्मेंट बोर्ड, पीडब्ल्यूडी व महापालिकेच्या कार्यालयांचे अनेकदा धाव घेतली. मात्र, नेमका रस्ता दुरुस्त करण्याची जबाबदारी कोणाची, याबाबत विभागांमध्ये परस्पर ढकलाढकली सुरू आहे. यामुळे नागरिकांचा त्रास वाढतच चालला होता.
या पार्श्वभूमीवर वानवडी वाहतूक विभागाने स्वतः पुढाकार घेत सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत रस्त्यांची दुरुस्ती सुरू केली. वाहतूक पोलिसांनी पेवर ब्लॉक्स टाकून रस्त्यावरील खड्डे बुजवले. यामुळे वाहतुकीचा प्रवाह सुरळीत झाला असून नागरिकांनी दिलासा व्यक्त केला आहे.
या उपक्रमात वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. फुलपगारे पोलीस हवालदार अनिल पवळे, संजीव पाटील, तामाने, महिला पोलीस हवालदार नांगरे तसेच पोलीस शिपाई भोसले, बाळू आल्हाट व चव्हाण यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. त्यांच्या या कार्याचे नागरिकांकडून विशेष कौतुक होत आहे.
शहरातील मूलभूत सोयीसुविधांच्या दुरावस्थेकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी नागरिकांची मागणी असून वाहतूक पोलिसांनी उचललेले हे पाऊल सामाजिक जाणीवेचे उत्तम उदाहरण ठरले आहे.






















