विनोद पवार (जळगाव प्रतिनिधी) निसर्ग संवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या निसर्ग मित्र समितीच्या वतीने शिवजयंतीनिमित्त जळगाव येथे राज्यस्तरीय पर्यावरण परिषदेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाचा छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्ग मित्र समिती ही परिषद आयोजित करत असून या परिषदेत सामाजिक, शैक्षणिक, कृषी, पर्यावरण, उद्योग, वैद्यकीय, शासकीय अधिकारी, ग्रामपंचायत तसेच विविध शैक्षणिक संस्थांचा सहभाग असणार आहे.
या परिषदेमध्ये पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जळगाव येथे महाराष्ट्र भूषण सन्मान २०२६ प्रदान करून गौरव करण्यात येणार आहे. तसेच राज्यातील पाच आदर्श व्यक्तींना महाराष्ट्र भूषण जीवन गौरव पुरस्कार २०२६ ने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
या वेळी पर्यावरण परिषद महाराष्ट्र भूषण – विशेषांक २०२६ प्रकाशित करण्यात येणार असून, सदर विशेषांकासाठी आपल्या परिसरातील आदर्श व्यक्तींचे प्रस्ताव पाठवावेत, असे आवाहन निसर्ग मित्र समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
या परिषदेसाठी आमदार, खासदार, ज्येष्ठ पर्यावरणप्रेमी, विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षणतज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्त्यांना निमंत्रित करण्यात येणार आहे. निसर्ग मित्र समितीचे संस्थापक प्रेमकुमार अहिरे, राज्याध्यक्ष डी. आर. बापू पाटील, जळगाव जिल्हाध्यक्ष प्रविण पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीला चालना देणारी ही परिषद जळगावसाठी अभिमानास्पद ठरणार असल्याचे मत आयोजकांनी व्यक्त केले आहे






















