Times Of Maharashtra Desk : राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत 125 पंचायत समित्यांसाठी आज मतदान प्रक्रिया सुरू झाली असून, सकाळी 7 वाजल्यापासून मतदार केंद्रांवर उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. जिल्हा परिषदेच्या 731 तर पंचायत समित्यांच्या 1,462 जागांसाठी ही निवडणूक होत असून, एकूण 7,438 उमेदवार रिंगणात आहेत. आज तब्बल 2 कोटी 8 लाख 20 हजार 702 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
राज्याच्या विविध भागांमध्ये ग्रामीण मतदारांनी सकाळपासूनच मतदान केंद्रांकडे धाव घेतल्याचं चित्र दिसत आहे. मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासन आणि निवडणूक आयोगाकडून आवश्यक ती तयारी करण्यात आली आहे. संबंधित जिल्ह्यांतील शाळा, महाविद्यालये आणि काही सरकारी कार्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील पानगाव येथील एका नवरदेवाने लग्नाआधी मतदान करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आनंद जयराम मोरे या नवरदेवाने घोड्यावरून निघालेली वरात थेट मतदान केंद्रात नेली आणि मतदानाचा हक्क बजावला. त्यांच्या या कृतीमुळे मतदार जागृतीचा संदेश दिला गेल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
विशेष म्हणजे, आनंद मोरे हे प्रशिक्षणार्थी गटविकास अधिकारी (बीडीओ) म्हणून कार्यरत असून, विवाहासाठी गावी आले होते. बोहल्यावर चढण्याआधी मतदान करून लोकशाही प्रक्रियेत सहभाग महत्त्वाचा असल्याचा संदेश त्यांनी दिला.
या निवडणुकांसाठी सुरुवातीला 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार होते. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे जाहीर करण्यात आलेल्या तीन दिवसांच्या दुखवट्यामुळे मतदानाची तारीख बदलून आज, 7 फेब्रुवारी करण्यात आली. मतदान प्रक्रिया आज संध्याकाळी साडेपाचपर्यंत सुरू राहणार असून, 9 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. या निवडणुकांमधून ग्रामीण भागातील राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे.






















