Times of Maharashtra Desk, Parbhani : अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे त्रस्त झालेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. परभणी येथील शेतकऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी महायुती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांवर तीव्र टीका केली, तसेच शेतकऱ्यांनी सरकारच्या आश्वासनांवर विश्वास न ठेवता निवडणुकीत आपला रोष व्यक्त करावा, असे थेट आवाहन केले.
आधी कर्जमाफी, मग मतदान
उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात शेतकऱ्यांपुढे निवडणुकीच्या राजकारणासंदर्भात महत्त्वाची भूमिका मांडली. शेतकऱ्यांनी आधी कर्जमाफी, मग मतदान हा नारा देऊन सरकारला जाब विचारण्याचे आवाहन त्यांनी केले. एकप्रकारे, त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीच्या उमेदवारांना बॉयकॉट करण्याचा संदेश दिला.
पंतप्रधान मोदी आणि सरकारवर ‘सावत्र’ वागणुकीचा आरोप
ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडून बिहारमध्ये प्रचार करण्यासाठी वेळ देत असल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. हे सरकार केवळ उद्योगपतींसाठी काम करत असून, शेतकऱ्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे, अशी टीका त्यांनी केली.
कर्जमाफी आणि मदतीची तीव्र मागणी
शेतकऱ्यांच्या मदतीच्या मुद्द्यावर ठाकरे यांनी महायुतीच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेतला. पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय जून २०२६ पर्यंत लांबणीवर टाकणे हे शेतकऱ्यांची थट्टा करण्यासारखे आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम सरकारने थांबवावे, असे ते म्हणाले. या पार्श्वभूमीवर त्यांनी, पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे बिनशर्त आणि संपूर्ण कर्ज माफ करावे, पीक नुकसानीसाठी शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपये इतकी भरघोस मदत तातडीने द्यावी.बिहारप्रमाणे महाराष्ट्रातील महिलांनाही कुटुंबाच्या मदतीसाठी दहा हजार रुपयांची विशेष मदत देण्यात यावी.
यावेळी ठाकरे यांनी आपल्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने दोन लाख पर्यंतची कर्जमाफी कोणत्याही अटीशिवाय दिली होती, याकडे लक्ष वेधले आणि सध्याच्या सरकारच्या उदासीन धोरणावर टीका केली.



















