Times of Maharashtra Desk, Pune : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर त्यांच्या हत्येचा कट रचल्याचा गंभीर आणि खळबळजनक आरोप केल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दावा केला की, त्यांना जीवे मारण्याचा कट रचण्यात आला असून, यासाठी अडीच कोटी रुपयांची सुपारी देण्यात आली होती. या संपूर्ण कटाचे मुख्य सूत्रधार धनंजय मुंडे असल्याचा थेट आरोप जरांगे यांनी केला आहे. जरांगे यांनी असाही दावा केला की, धनंजय मुंडे यांनी आरोपींना बाहेरच्या राज्यातील पासिंगची गाडी आणि विषप्रयोगासाठी गोळ्या पुरवण्याचे आश्वासन दिले होते. मुंडेंच्या पीएने एका आरोपीला परळीला नेले, जिथे मुंडे एका महत्त्वाच्या बैठकीतून बाहेर पडून आरोपीला २० मिनिटे भेटले. तसेच, छत्रपती संभाजीनगरच्या झालटा फाट्यावर मुंडे आरोपींची एक तास वाट पाहत थांबले होते, असे तपशीलही जरांगे यांनी उघड केले. एकतर अपघात घडवणे किंवा औषधातून विषप्रयोग करणे, असा हा प्लॅन होता, असेही ते म्हणाले.
काय म्हणाले मुंडे ?
मनोज जरांगे यांच्या आरोपांनंतर धनंजय मुंडे यांनी तातडीने पत्रकार परिषद घेत हे सर्व आरोप फेटाळून लावले. मुंडे यांनी हे आरोप बिनबुडाचे आणि फालतू असल्याचे म्हणत, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी महाराष्ट्र शासनाने न करता थेट सीबीआय कडून करण्याची मागणी केली. आपल्यावरील आरोपांमुळे संताप व्यक्त करत मुंडे म्हणाले, “जर हे आरोप खरे ठरले, तर माझ्यासहीत अख्ख्या ओबीसी समाजाला गोळ्या घाला आणि संपवून टाका.” इतकेच नाही, तर मुंडे यांनी “माझी, मनोज जरांगेंची आणि ज्या आरोपींना पकडले आहे, त्या तिघांचीही नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंग करा,” असे खुले आव्हान दिले. मी ओबीसी आरक्षणाची बाजू लावून धरली, याचाच राग काहींना येत असून, त्यातूनच हे आरोप होत असल्याचे मुंडे यांनी सांगितले.
मनोज जरांगे पाटलांनी आव्हान स्वीकारले
धनंजय मुंडे यांच्या पत्रकार परिषदेनंतर आणि नार्को टेस्टच्या आव्हानानंतर, मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा माध्यमांशी संवाद साधत ते आव्हान तातडीने स्वीकारले. “मी नार्को टेस्टला तयार आहे आणि उद्याच मी गृह मंत्रालय, कोर्ट आणि पोलीस अधीक्षकांकडे जाऊन नार्को टेस्टसाठी पहिला अर्ज करणार,” असे जरांगे यांनी जाहीर केले. यावेळी जरांगे यांनी दोन आरोपींमधील संभाषणाची एक ऑडिओ क्लिप पत्रकार परिषदेत ऐकवली आणि धनंजय मुंडेच खरे सूत्रधार असल्याचा पुनरुच्चार केला. “धन्या, मी तुझ्यासारखा नाही, मी जातवाण आहे,” असा थेट टोलाही त्यांनी मुंडेंना लगावला. या आरोप-प्रत्यारोपांमुळे आता या प्रकरणाच्या तपासाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.






















