Times of Maharashtra Desk : आज 7 नोव्हेंबर म्हणजेच ‘विद्यार्थी दिवस’ म्हणजे भारतीय इतिहासातील शिक्षण क्षेत्राबरोबर सामाजिक क्षेत्रातील ऐतिहासिक क्रांतिकारी दिवस होय. पुस्तकावर जिवापाड प्रेम करणारे, पुस्तक म्हणजे जीव की प्राण असणारे, शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा मानणारे, डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळेतील पहिला प्रवेश दिन म्हणजे 7 नोव्हेंबर. अतिउच्च दर्जाची विद्वता व ज्ञान असतानाही आंबेडकरांनी स्वतःला आजन्म विद्यार्थी मानले, आणि ते आदर्श विद्यार्थी ठरले आणि या महामानवाचा शाळेतला हा पहिला दिवस म्हणून महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने हा दिवस, विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय २७ ऑक्टोबर, २०१७ रोजी घेतला. तेव्हा पासून हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा शाळेतील पाहिला दिवस
सन १९०० तारीख 7 नोव्हेंबर, सातारा जिल्हयातील राजवाडा चौकात असलेल्या गव्हर्नमेंट हायस्कूलमध्ये म्हणजेच आताच्या प्रतापसिंह हायस्कूलमध्ये भिवा रामजी आंबेडकर या बाल मुलाने म्हणजेच आपल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी प्रवेश घेतला. इथे ते इयता पहिली ते चौथी इंग्रजी माध्यमात शिकले. आज ही या शाळेत सन १९०० ते १९०४ या वर्षातील रजिस्टरमध्ये १९१४ क्रमांकासमोर बाल भिवाची स्वाक्षरी आहे. हा ऐतिहासिक दस्तऐवज शाळा प्रशासनाच्या परवानगीने दलित फाऊंडेशनने २००७ मध्ये सर्व पानांचे लॅमिनेशन करून जतन केला आहे. आजही शाळेच्या मुख्य कार्यालयात ही प्रत पाहायला मिळते. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी इथून आपल्या वाटचालीला सुरवात केली आणि एक विद्यार्थी बनून जीवनभर शिक्षण क्षेत्रात प्रवास केला. जगाला धर्मनिरपेक्ष, न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता समानता ही मूल्ये शिकविली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची परिस्थिती अत्यंत हलाकीची होती. गरिबीच्या झळांसोबतच पोटाला चिमटे घेऊन त्यांना जगावे लागे. परंतू तरीही शिक्षण हा केंद्रबिंदू मानून, शिक्षणाशिवाय उपाय नाही हे जाणून बाबासाहेबांच्या वडिलांनी म्हणजे रामजींनी त्यांना प्रथम शाळेत घातले, शिक्षणाचे महत्व त्यांना सांगितले आणि पुढे हीच शिकवण भारतीय समाजसुधारणेत एक मशाल म्हणून पेटू लागली. बाबासाहेब अभ्यासात चतुर होते. नेहमी पहिल्या क्रमांकाने पास होत. पुस्तक वाचनाचे वेड त्यांना शाळेपासूनच लागले.आणि अशा या अभ्यासू व्यक्तिमत्वाची शिकवण सर्व विद्यार्थ्यांना मिळावी म्हणून हा दिवस ‘विद्यार्थी दिवस’ दिवस म्हणून साजरा केला जातो.
७ नोव्हेंबर ह्या दिवसाला विद्यार्थी दिवस म्हणून मान्यता..
२०१७ मध्ये सातारच्या प्रवर्तन संगठनाचे अध्यक्ष अरुण जावळेंनी मंत्री राजकुमार बडोले आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना ७ नोव्हेंबर हा दिवस राज्य शाळाप्रवेश दिन म्हणून घोषित करावा असा प्रस्ताव दिल होता. त्यांच्या मागणीनुसार दोन्ही मंत्र्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या शाळेमधील प्रवेश दिन ७ नोव्हेंबरला ‘विद्यार्थी दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. २०१७ मध्ये बाबासाहेबांचा शाळा प्रवेश या घटनेचे स्मरण म्हणून तसेच, विद्यार्थ्यांना शिक्षण हेच उन्नतीचे एकमेव साधन असून त्याच्या कठोर परिश्रमाची जाण व्हावी यासाठी शासनाने हा दिवस विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. २०१७ पासून दर वर्षी संपूर्ण महाराष्ट्रात हा दिवस आगदी जल्लोषात साजरा केला जातो. डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वतःला आयुष्यभर विद्यार्थी संबोधायचे. म्हणजेच मी आयुषभर शिकत राहणार असे त्यांचे म्हणणे असायचे. आणि त्यांच्या या विचारांचा सन्मान म्हणजे हा विद्यार्थी दिवस होय.
विद्यार्थी दिवस कसा साजरा करतात ?
या दिवशी शाळांमध्ये विविध प्रकरच्या स्पर्धा घेतल्या जातात. यामध्ये निबंध लेखन, वक्तृत्व स्पर्धा, आणि कविता वाचन यांचा समावेश असतो, ज्यात आंबेडकरांच्या जीवनातील तत्त्वज्ञान व कार्यावर प्रकाश टाकणारे लेख व त्यांचे विचार असतात. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण होते तसेच त्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जवळून अभ्यासण्याची संधी मिळते.






















