शिरपूर (प्रतिनिधी शेटे): शिरपूर तालुक्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, बाधित शेतकऱ्यांना तात्काळ वाढीव नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी ‘शिरपूर फर्स्ट’ संघटनेने केली आहे.
या मागणीसाठी संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात भेट देत निवेदन सादर केले. यावेळी कार्यकर्त्यांनी कांदा, मका आणि केळीची पिके गळ्यात टांगून अनोख्या पद्धतीने आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले.
जानेवारी महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे भाटपुरा, सावेर, अजनाड, थाळनेर परिसरातील पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर २ एप्रिल रोजी झालेल्या अवकाळी पावसाने सुमारे ३० गावांतील शेतीचे नुकसान वाढवले. मात्र, अद्यापही अनेक शेतकऱ्यांना अपेक्षित नुकसान भरपाई मिळालेली नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली.
याशिवाय पीक विम्याची थकीत रक्कम लवकर वितरित करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास येत्या सात ते आठ दिवसांत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
यावेळी हंसराज चौधरी, चेतन मोरे, प्रशांत राजपूत, ईश्वर पाटील आदी उपस्थित होते.






















