Times of Maharashtra Desk, Pune: पुणे महानगरपालिका निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट होत असताना, प्रभाग क्रमांक ४ वाघोली-खराडी येथील विकासातील असंतुलन आणि मूलभूत सोयी-सुविधांची वानवा हेच निवडणुकीचे प्रमुख मुद्दे बनले आहेत. एका बाजूला माहिती तंत्रज्ञान उद्यानामुळे विकसित झालेला खराडी परिसर आणि दुसऱ्या बाजूला मूलभूत सुविधांपासून वंचित असलेला वाघोली परिसर असा हा विरोधाभास नागरिकांमध्ये तीव्र प्रशासकीय असंतोष निर्माण करत आहे. या प्रभागामध्ये विकासाच्या विषमतेमुळे नागरिकांमध्ये नाराजी असून याच समस्या आगामी निवडणुकीत प्रमुख मुद्दे ठरण्याची चिन्हे आहेत.
विकासाची वेगवेगळी चित्रे
हा भाग आयटी पार्कमधील कंपन्यांमुळे विकसित झाला आहे. तरीही येथे पाण्याची गंभीर समस्या कायम आहे. सोसायट्यांना पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यासाठी लाखो रुपये खर्च करावे लागत आहेत. कचरा गोळा करण्यासाठीही नागरिकांना जास्त शुल्क द्यावे लागत आहे. मोठ्या सार्वजनिक उद्यानांचीही येथे कमतरता आहे. वाघोलीचा महापालिकेत समावेश होऊनही वाघोलीत रस्ते, पाणी, वीज, कचरा व्यवस्थापन, ड्रेनेज अशा मूलभूत सुविधांची मोठी कमतरता आहे.
येथील नागरिक म्हणतात की, ग्रामपंचायत असताना व्यवस्था काही प्रमाणात बरी होती. पावसाळ्यात पूर येणे, रस्त्यांवर सांडपाणी वाहणे, दुर्गंधी, कचऱ्याचे ढीग आणि वाहतूक कोंडी यांसारख्या समस्यांनी नागरिक त्रस्त आहेत. केसनंद रस्त्याची दुरवस्था झाली असून अहिल्यानगर महामार्गावर स्कायवॉक नसल्याने अपघात वाढले आहेत सार्वजनिक शौचालये, क्रीडांगणे यांसारख्या सुविधाही येथे उपलब्ध नाहीत. कर भरूनही समस्या सुटत नसल्याने येथील नागरिकांचा प्रशासनावर रोष वाढला आहे.
प्रभागामध्ये या भागांचा समावेश
चंदननगर, खुळेवाडी, थिटेवस्ती, खराडी, उबाळेनगर, बाईफ रोड, वाघोली आरोग्य केंद्र, आठवडे बाजार परिसर, केसनंद रोड, आयव्ही इस्टेट आदी.
प्रभागात आतापर्यंत झालेली विकासकामे
श्री प्रभू रामचंद्र उद्यानाची निर्मिती, वाघोली-मुळा मुठा मुख्य ड्रेनेजलाइन, अंतर्गत रस्त्यांची झालेली दुरुस्ती, अंतर्गत रस्त्यांवर पथदिवे बसविले.
प्रभागातील प्रमुख समस्या
वाघोली येथे होणारी वाहतूक कोंडी, पावसाळ्यात निर्माण होणारी पूरस्थिती, कचरा व्यवस्थापनाचा अभाव, पाण्याच्या टाक्यांची कामे रखडली, रस्त्यांसह पदपथांची दुरवस्था, पदपथ आणि रस्त्यांवर झालेली अतिक्रमणे, मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांचे रुंदीकरण.
या प्रभागात मूलभूत सुविधांचे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे ठरले आहेत. ज्या उमेदवारांनी या समस्या सोडवण्यासाठी प्रभावीपणे काम केले आहे, त्यांना नागरिकांची नाराजी दूर करून पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे.माजी नगरसेवक भैय्यासाहेब जाधव यांनी केलेले काम आणि त्यांची प्रतिमा यामुळे ते सध्याच्या असंतोषाचा फायदा घेण्याची शक्यता आहे.






















