Times Of Maharashtra : राज्यातील महिला शेतकऱ्यांना शाश्वत, आधुनिक आणि वैज्ञानिक शेतीकडे वळवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. याच अनुषंगाने मंगळवारी महाराष्ट्र सरकार आणि गोदरेज अॅग्रोव्हेट लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. या कराराअंतर्गत राज्यातील तब्बल ५ हजार महिला शेतकऱ्यांना शाश्वत शेती पद्धतींचे सखोल प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
या उपक्रमाबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, शेतीमधील महिलांची भूमिका केवळ सहाय्यक नसून ती निर्णायक आहे. महिला शेतकऱ्यांचे सक्षमीकरण झाले, तर ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल. हा करार महिला सक्षमीकरणासोबतच राज्याच्या कृषी विकासासाठीही मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कापूस उत्पादक जिल्ह्यांवर विशेष लक्ष
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली हा करार गोदरेज अॅग्रोव्हेट लिमिटेड आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (MSRLM) यांच्यात करण्यात आला आहे. या उपक्रमाअंतर्गत राज्यातील कापूस उत्पादक जिल्ह्यांमधील महिला शेतकऱ्यांना आधुनिक, पर्यावरणपूरक आणि वैज्ञानिक शेती पद्धतींचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
या प्रशिक्षणामध्ये केवळ उत्पादन वाढीवर भर न देता, शेतीचा खर्च कमी करणे, नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन, जमिनीची सुपीकता टिकवणे आणि उत्पन्नात स्थिरता आणणे यासंदर्भातही मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
महिला आत्मनिर्भरतेकडे एक पाऊल
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शेतकरी हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांमध्ये महिलांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. महिला शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, वैज्ञानिक ज्ञान आणि बाजारपेठेची योग्य माहिती मिळाल्यास त्या आत्मनिर्भर बनतील आणि राज्याच्या विकासात मोलाचे योगदान देतील.
शेतकऱ्यांना सुलभ कर्ज, तांत्रिक मदत आणि आवश्यक सुविधा वेळेवर उपलब्ध करून देण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.






















