Times Of Maharshtra Desk : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर करण्यात येणाऱ्या धार्मिक विधींविषयी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अजित पवार यांचा दशक्रिया विधी नियोजित तारखेपूर्वीच पार पडल्याचे त्यांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले आहे. त्यामुळे आता पुढील दहावा किंवा तेरावा दिवस असा कोणताही सार्वजनिक किंवा धार्मिक विधी होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
28 जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यानंतर 30 जानेवारी रोजी अस्थी सावडण्याचा कार्यक्रम पार पडला. त्याच दिवशी सोनगाव येथील कऱ्हा–नीरा संगमावर अस्थी विसर्जन करण्यात आले.
याच वेळी कुटुंबीयांनी आवश्यक ते सर्व धार्मिक विधी पूर्ण केल्यामुळे दशक्रिया विधीही 30 जानेवारीलाच पार पडल्याची माहिती श्रीनिवास पवार यांनी दिली. पवार कुटुंबीयांशी चर्चा करूनच ही माहिती दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार किंवा जय पवार यांच्याकडून यावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
दरम्यान, आज बारामतीच्या काटेवाडी येथील अजित पवार यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेटींचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ‘सहयोग’ या निवासस्थानी दुपारी चार वाजेपर्यंत कुटुंबीय भेटी स्वीकारणार असून, सकाळपासूनच नेते, कार्यकर्ते व नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
दरम्यान, राजकीय वर्तुळातही हालचालींना वेग आला आहे. पार्थ पवार यांच्या राज्यसभेतील संभाव्य प्रवेशाबाबत चर्चा सुरू असून, सूत्रांच्या माहितीनुसार लवकरच या संदर्भात निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.






















