विष्णू गायकवाड ( गेवराई प्रतिनिधी) : कुटुंबाचा मुख्य कर्ता व्यक्ती अचानक निधन पावल्यास त्या कुटुंबावर मोठे आर्थिक व मानसिक संकट कोसळते. अशा कठीण प्रसंगी दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल) कुटुंबांना आधार देण्यासाठी केंद्र शासनाची ‘राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना’ महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या योजनेअंतर्गत मिळणारी एकरकमी आर्थिक मदत अनेक कुटुंबांसाठी नव्याने उभे राहण्याचे बळ ठरत आहे.
योजनेचा उद्देश आणि स्वरूप
ही योजना केंद्र शासन पुरस्कृत असून महसूल विभागामार्फत राबविली जाते. कुटुंबातील एकमेव कमावत्या व्यक्तीचा (स्त्री किंवा पुरुष) मृत्यू झाल्यास संबंधित कुटुंबाला आर्थिक मदत म्हणून २० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान दिले जाते.
लाभार्थ्यांची संख्या वाढतेय
गेलेल्या आर्थिक वर्षात गेवराई तालुक्यातील ५५ पात्र कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यात आला. प्रत्येक कुटुंबाच्या बँक खात्यात थेट २० हजार रुपये जमा करण्यात आले. अचानक उद्भवलेल्या संकटातून सावरण्यासाठी ही मदत उपयुक्त ठरल्याचे लाभार्थ्यांनी सांगितले.
पात्रता निकष
-
मृत व्यक्ती कुटुंबातील मुख्य कमावती असावी
-
मृत व्यक्तीचे वय १८ ते ६० वर्षांदरम्यान असावे
-
कुटुंब बीपीएल यादीत समाविष्ट असणे आवश्यक
आवश्यक कागदपत्रे
-
मृत्यू दाखला
-
वयाचा पुरावा (आधार कार्ड / जन्म दाखला / शाळा सोडल्याचा दाखला)
-
बीपीएल प्रमाणपत्र किंवा रेशन कार्ड
-
वारसांचे प्रतिज्ञापत्र
-
बँक पासबुकची झेरॉक्स
अर्ज प्रक्रिया
मृत्यू झाल्यापासून एका वर्षाच्या आत अर्ज करणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील अर्जदारांनी तहसील कार्यालयातील संजय गांधी योजना विभागात, तर नागरी भागातील नागरिकांनी सेतू केंद्रात अर्ज सादर करावा.
नायब तहसीलदार संजय सोनवणे यांनी नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी वेळेत अर्ज करावा, असे आवाहन केले आहे.






















