धीरज महांगरे ( पुणे शहर प्रतिनिधी ) : हडपसर परिसरातील यश रवी पार्क, चिंतामणी नगर येथे भटक्या कुत्र्यांचा वाढता त्रास नागरिकांसाठी गंभीर चिंतेचा विषय बनला आहे. परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्थानिक रहिवाशांच्या मते, काही कुत्र्यांकडून चावण्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. त्यामुळे रोजच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत आहे. विशेषतः दोन चाकी वाहनांवरून प्रवास करणारे नागरिक, कामावर ये-जा करणारे कर्मचारी आणि शाळेत जाणारी लहान मुले यांना या समस्येचा मोठा धोका निर्माण झाला आहे.
रात्रीच्या वेळेस ही परिस्थिती अधिक गंभीर होते. उशिरा घरी परतणाऱ्या नागरिकांना कुत्र्यांच्या हल्ल्याची भीती सतावत आहे. भटक्या कुत्र्यांचे टोळके रस्त्यांवर फिरताना दिसत असल्याने परिसरात असुरक्षिततेची भावना वाढली आहे.
नागरिकांनी स्पष्ट केले की, त्यांना प्राण्यांविषयी सहानुभूती आहे आणि प्राणीप्रेमालाही ते विरोध करत नाहीत. मात्र, त्याचबरोबर नागरिकांची सुरक्षितता देखील तितकीच महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.
या पार्श्वभूमीवर स्थानिक रहिवाशांनी प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. भटक्या कुत्र्यांचे लसीकरण, नसबंदी आणि योग्य व्यवस्थापन करण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सामाजिक कार्यकर्ते तथा पुणे शहर प्रतिनिधी धीरज महांगरे यांनीही प्रशासनाला या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे आवाहन केले आहे. वेळेत उपाययोजना न केल्यास भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.






















