गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचार, अन्याय आणि भेदभावाच्या घटना अजूनही चिंताजनकरीत्या समोर येत आहेत. दररोज नवीन प्रकरणे उघडकीस येत असताना, महिला आयोगासारख्या महत्त्वाच्या संस्थेला सक्षम, धाडसी आणि निर्णयक्षम नेतृत्वाची गरज अधिक प्रकर्षाने जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर एक नाव ठळकपणे पुढे येत आहे—एकल महिला संघटनेच्या कार्यकर्त्या रुक्मिणीताई नागपुरे.
रुक्मिणीताई नागपुरे या केवळ वक्तृत्वापुरत्या मर्यादित न राहता प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून लढा देणाऱ्या कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातात. मंदिर प्रवेश आंदोलन असो किंवा महिलांच्या सन्मानासाठीचा संघर्ष, त्यांनी नेहमीच आघाडीवर राहून अन्यायाविरुद्ध आवाज उठवला आहे. त्यांनी समाजातील प्रश्न केवळ मांडले नाहीत, तर लोकांना जागरूक करून बदल घडवण्याचा प्रयत्न केला आहे.
आज महिला आयोगाला अशाच निर्भीड, बिनधास्त आणि दबावाला न घाबरणाऱ्या नेतृत्वाची आवश्यकता आहे. समाजसेवेची प्रामाणिक भावना आणि संघर्षशील वृत्ती यामुळे रुक्मिणीताई नागपुरे या या पदासाठी योग्य उमेदवार ठरू शकतात, अशी मागणी बीड जिल्ह्यातून जोर धरत आहे.
याच संदर्भात बीड जिल्ह्यातील एका महिलेने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ई-मेलद्वारे विनंती केली आहे. या विनंतीत रुक्मिणीताई यांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्याचा सकारात्मक विचार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
महिलांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या नेतृत्वाला संधी मिळाल्यास समाजात सकारात्मक बदल घडू शकतो, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. आता सरकार या मागणीवर काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






















